आजारी कारखाने विक्रीतून भ्रष्टाचार!

By Admin | Updated: April 9, 2016 03:22 IST2016-04-09T03:22:02+5:302016-04-09T03:22:02+5:30

राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणे हेच शेतकरी आत्महत्येच्या कारणापैकी एक प्रमुख कारण आहे. साखर सम्राटांनी १७७ कारखाने आजारी पाडून त्यातील ४४ कारखाने विक्री केले

Corruption from sick factory sales! | आजारी कारखाने विक्रीतून भ्रष्टाचार!

आजारी कारखाने विक्रीतून भ्रष्टाचार!

जालना : राज्यातील सहकार चळवळ मोडीत काढणे हेच शेतकरी आत्महत्येच्या कारणापैकी एक प्रमुख कारण आहे. साखर सम्राटांनी १७७ कारखाने आजारी पाडून त्यातील ४४ कारखाने विक्री केले. यातून सुमारे २५ हजार कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे. दोषींवर कारवाई व्हावी, यासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अ‍ॅड. सतीश तळेकर हे जनहित याचिका दाखल करणार आहेत. त्यात याचिकाकर्ते म्हणून आपली पहिली स्वाक्षरी राहील, अशी माहिती अ.भा. मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
जालना येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेच्या उद्घाटनासासाठी ते आले होते. याप्रसंगी ते म्हणाले, राज्यातील दुष्काळीस्थिती आणि शेतकरी आत्महत्येस सर्वस्वी सरकारच जबाबदार आहे. शेतकरी आत्महत्येमागे सर्वात महत्त्वाचे कारण हे सहकारी चळवळ मोडीत काढणे हेच आहे. (प्रतिनिधी)
> भागवत- ओवैसी
दोन विकृत टोके
भारत माता की जय बोलने आणि न बोलने यावरून होत असलेला वाद म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मोहन भागवत आणि एमआयएमचे ओवैसी यांचे दोन विकृत टोके आहेत. ते म्हणाले, भारत माता की जय प्रत्येकाने म्हटलेच पाहिजे, मात्र त्याची सक्ती नको, भारतीय राज्य घटनेच्या चौकटीत राहुनच भारत मातेचा जयजयकार झाला पाहिजे, असे आपले वैयक्तिक मत असल्याचे सबनीस म्हणाले.
महाराष्ट्राचे तुकडे पाडू नका
मराठवाडा आणि विदर्भासाठीच्या निधीची पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी नेहमीच लूट केली आहे. राज्यपालांचा आदेश न जुमानता ही लूट करण्यात आली. त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या वाट्याला दु:ख आले. त्यातून वेगळ्या राज्याचा मुद्दा समोर आला. तेव्हा सरकारने त्यांचे दु:ख समजून घेऊन विकासासाठी न्याय देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. मात्र, त्यासाठी महाराष्ट्राचे तुकडे पाडू नये, असा आग्रह सबनीस यांनी केला.

Web Title: Corruption from sick factory sales!