राज्यातील कोरोनाची दुसरी लाट आता ओसरताना दिसत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका महाराष्ट्राला बसला होता. परंतु आता राज्य त्यातून बाहेर येताना दिसत आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची अधिक नोंद करण्यात आली. चोवीस तासांत राज्यात ५ हजार ४२४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ४ हजार ४०८ नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या चोवीस तासांत राज्यात ११६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत राज्यात एकूण ६२,०१,१६८ रूग्णांनी कोरोनावर मात केली आहे. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८७ टक्क्यांवर पोहोचले आहे. आतापर्यंत राज्यात एकूण ६४,०१,२१३ कोरोनाबाधितांची नोंद झाली.