लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : रेमडेसिविर इंजेक्शन्स आणि ऑक्सिजनसह राज्यात कोरोना लसींचाही प्रचंड तुटवडा पडला आहे. मंगळवारी राज्यातील महापालिका क्षेत्रातील परिस्थितीचा अंदाज घेतला असता कुठे तीन दोन-तीन दिवसांचा तर कुठे फक्त बुधवारी दिवसभर पुरेल एवढाच साठा उपलब्ध आहे.
ठाणे/नवी मुंबईठाणे महापालिका क्षेत्रात सध्या ९१ हजार एवढा साठा शिल्लक आहे. शहरासाठी ५ लाख एवढी मागणी आहे. हा साठा पुढील २ ते ३ दिवस पुरेल. तर नवी मुंबईत ५५०० लसीचे डोस शिल्लक आहेत. रोज ७५०० डोसची गरज आहे. बुधवारी नवीन साठा उपलब्ध होईल. विदर्भअमरावतीत १८ एप्रिल रोजी साठा निरंक असल्याने १२५ केंद्रे बंद होती. त्याच दिवशी उशिरा २२,६४० लसी प्राप्त झाल्या. सोमवारी यापैकी दोन हजार लसी महापालिकेला व ५०० खासगी केंद्रांना देण्यात आल्या. सध्या १० हजार लसी शिल्लक आहेत.नागपूर शहरात मंगळवारी २० हजार डोस उपलब्ध होते. शहरात आतापर्यंत ४ लाख २८ हजार ८३८ लाभार्थींना देण्यात आला. पहिला डोस ३ लाख ८४ हजार ३६७ लाभार्थींना तर दुसरा डोस ४४ हजार ४७१ लाभार्थींना देण्यात आला.
मराठवाडाऔरंगाबादेत सध्या ५ हजार लसींचा साठा असून तो दोन दिवस पुरेल. जिल्ह्यात आतापर्यंत ३ लाख ४४ हजार ५९६ डोस देण्यात आले आहेत. परभणीत लसीचाही तुटवडा आहे. ६ लाख ४८ हजार नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या लसीचे ७ हजार डोस उपलब्ध आहेत. ही लस केवळ एक दिवस पुरेल एवढीच आहे.लातूरमध्ये सध्या १५ हजार डोस उपलब्ध आहेत. ती आठवडाभर पुरेल. आतापर्यंत २ लाख १०१ डोसचे लसीकरण झाले असून २२ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. नांदेड महानगरपालिकेकडे १० हजार लसींचा साठा उपलब्ध आहे. शहरातील १० केंद्रावर लसीकरण सुरू असून दररोज साधारण १४०० लसीकरण होत आहे.
पश्चिम महाराष्ट्रकोल्हापुरात लसीकरणासाठी १२ सेंटर्स सुरू आहेत. परंतु सध्या लसीचा साठा संपला आहे. प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे ३० हजार डोसची मागणी दोन दिवसांपूर्वी केली आहे. पण लस उपलब्ध झालेली नाही. उत्तर महाराष्ट्रजळगावात सोमवारी १३ हजार लसीचे डोस प्राप्त झाले असून हे डोस तीन दिवस पुरतील. प्रशासनाकडून मागणी नोंदविण्यात आली असून आगामी दोन दिवसात आणखी डोस उपलब्ध होऊ शकतील, अशी माहिती आहे. धुळे पालिका क्षेत्रात ६००० लसींचा साठा उपलब्ध आहे.