आरएसएसच्या हातात देशाचा ताबा
By Admin | Updated: January 16, 2016 02:11 IST2016-01-16T02:11:29+5:302016-01-16T02:11:29+5:30
प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा आरोप; लाँग मार्च संघर्षभूमीवर शहिदांना अभिवादन.

आरएसएसच्या हातात देशाचा ताबा
दुसरबीड (बुलडाणा) : देशात अच्छे दिन लायेंगे या घोषणेच्या लाटेवर मोदी सरकार सत्तारूढ झाले; परंतु राष्ट्रीय सेवा संघच या देशाची सत्ता सांभाळत आहेत. जातीच्या व धर्माच्या नावाखाली या देशाचे तुकडे पाडण्याचा डाव खेळला जात आहे; तो हाणून पाडण्याचे काम पुढील काळात करावे लागेल असा इशारा देत, पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी भाजप सरकारवर कडाडून टीका केली. १५ जानेवारी रोजी लाँग मार्च संघर्षभूमीवर प्रा. कवाडे यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम झाला. याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला आमदार राहुल बोंद्रे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, गोपाळराव आटोटे, चरणदास इंगोले, जयदीप कवाडे, प्रा. रंजनाताई कवाडे, भाई छगन खंदारे, दलित मुक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष विजय गवई आदी उपस्थित होते. औरंगाबाद विद्यापीठाच्या नामांतरलढय़ात झालेल्या शहिदांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी १५ जानेवारी २0१७ रोजी संघर्षभूमीवर विजयस्तंभ उभारण्याची ग्वाही यावेळी प्रा. कवाडे यांनी दिली. यावेळी आ. बोंद्रे, जयदीप कवाडे, विजय गवई, गोपाळराव आटोटे, चरणदास इंगोले, विजय अंभोरे, भिकाजी इंगळे यांच्यासह अनेकांची भाषणे झाली. शेवटी नामांतर स्मृती सोहळ्यातील शहिदांना आदरांजली वाहण्यात आली.