लादलेल्या उमेदवारींमुळेच काँग्रेसचे ‘बुरे दिन’

By Admin | Updated: July 20, 2014 01:22 IST2014-07-20T01:22:50+5:302014-07-20T01:22:50+5:30

शहरात एकेकाळी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार निवडून येत होते. काही मतदारसंघ हे काँग्रेसचा गड होते. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पुढे राहते त्याच मतदारसंघात

Congress's 'bad day' | लादलेल्या उमेदवारींमुळेच काँग्रेसचे ‘बुरे दिन’

लादलेल्या उमेदवारींमुळेच काँग्रेसचे ‘बुरे दिन’

कार्यकर्ता मेळावा : शहराध्यक्षांनी प्रदेशाध्यक्षांना दाखविला आरसा
नागपूर : शहरात एकेकाळी काँग्रेसचे सर्वच्या सर्व आमदार निवडून येत होते. काही मतदारसंघ हे काँग्रेसचा गड होते. लोकसभा निवडणुकीत ज्या विधानसभा मतदारसंघात काँग्रेस पुढे राहते त्याच मतदारसंघात विधानसभेत काँग्रेस का हरते, यावर चिंतन करण्याची गरज आहे. प्रामाणिक कार्यकर्त्याला उमेदवारी देताना डावलले जाते. दिल्ली दरबारी वजन वापरून उमेदवारी आणली जाते. अशा लादलेल्या उमेदवारीमुळे काँग्रेसचे ‘बुरे दिन’ आले आहेत, असे परखड मत शहराध्यक्ष विकास ठाकरे यांनी शनिवारी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या समक्ष काँग्रेस कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले.
शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने शनिवारी जुना काटोल रोड चौक स्थित बचत सभागृहात पश्चिम नागपूर कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला. मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, विनोद गुडधे पाटील, आ. दीनानाथ पडोळे, माजी खा. गेव्ह आवारी, यादवराव देवगडे, प्रदेश सचिव जयप्रकाश गुप्ता, शेख हुसेन, सरचिटणीस अतुल कोटेचा उपस्थित होते. याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हरीश ग्वालबंशी, नितीश ग्वालबंशी यांच्यासह तन्हा नागपुरी, अनिल परतेकी आदींनी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. विकास ठाकरे यांनी मेळाव्याची भूमिका स्पष्ट करताना आक्रमक भूमिका मांडली. काँग्रेसच्या सामान्य कार्यकर्त्यांवर सातत्याने जो अन्याय सुरूआहे, त्यावरून कदाचित नक्षलवादी असेच तयार होत असतील, असे परखड मत त्यांनी मांडले. राज्यमंत्री राजेंद्र मुळक म्हणाले, पश्चिम नागपूर काँग्रेसचा गड होता. परंतु २० वर्षांपासून तिथे काँग्रेस नाही. पश्चिमचा आमदार कोण हे सुद्धा जनतेला माहिती नाही. विधानसभेत त्यांनी मतदारसंघातील प्रश्न उपस्थित केला नाही. येत्या निवडणुकीत आम्ही सर्व एकसंघ होऊन काँग्रेसला विजयी करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संचालन घनश्याम मांगे तर आभार संजय सरायकर यांनी मानले. या वेळी सुनील चोपडा, दीपक वानखेडे, ईश्वर बरडे, अरुण डवरे, शिला मोहोड, सरस्वती सलामे, पदमा उइके, सुनील चोपडा आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
कितीही शहा आले तरी चिंता नाही - माणिकराव
काँग्रेसचे विचार आणि शाहू, फुले आंबेडकरांचे विचार या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यामुळे कितीही शहा (भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा) आले तरी महाराष्ट्राची जनता आरएसएसला भीक घालणार नाही, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही, असे मत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केले. सत्तेसाठी संघाने काँग्रेसच्या विरोधात विषारी प्रचार केला. महात्मा गांधीजींची हत्या कोणत्या विचारांनी केली, हे लोकांना माहीत आहे. भाजपाचा खोटारडेपणा जनतेसमोर उघड झाला आहे. तेव्हा काँग्रेसच्या नेत्यांनी व कार्यकर्त्यांनी आपसी मतभेद विसरावे. काँग्रेस वटवृक्ष आहे. सर्वांना सोबत घेऊन जाणारा पक्ष आहे. सर्वांचाच मान राखला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
लोकमतच्या पोलखोलचा उल्लेख
नागपूर महापालिका सामान्यजनांना मूलभूत सेवा देण्यास अपयशी ठरली आहे. अनेक योजना रखडलेल्या आहेत. याबाबत लोकमतने ‘ नो उल्लू बनाविंग’ हे विशेष पान काढून मनपाची पोलखोल केली, असा उल्लेख वित्त व ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी यावेळी केला.

Web Title: Congress's 'bad day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.