काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचंय - नितीन गडकरी
By Admin | Updated: February 25, 2017 16:14 IST2017-02-25T16:11:24+5:302017-02-25T16:14:31+5:30
काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेस शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे, असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले आहे.

काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचंय - नितीन गडकरी
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - मुंबई महानगरपालिकेतील सत्तेपासून भाजपाला दूर ठेवण्यासाठी शिवसेना-काँग्रेसच्या संभाव्य युतीची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. यावरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर हल्लाबोल चढवला आहे.
'काँग्रेसला राज्यातील सरकार अस्थिर करायचे आहे. यामुळेच काँग्रेसमधील काही नेतेमंडळी शिवसेनेला समर्थन देण्याची भाषा करत आहे', असे टीकास्त्र नितीन गडकरी यांनी सोडले आहे.
मुंबई महापालिका निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने शिवसेनेनं आपले पर्याय खुले ठेवल्याचे म्हटले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महापौर पदासाठी शिवसेना काँग्रेसचा पाठिंबा घेऊ शकते. तसंच शिवसेनेकडून काँग्रेसला उप-महापौर पदाची ऑफरही देण्यात आली आहे. शिवाय, शिवसेना फडणवीस सरकारसोबतचे नाते संपुष्टात आणून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेऊन सत्तेसाठी नवे समिकरण बनवू शकते, अशीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या सर्व चर्चांनुसार, नितीन गडकरी यांनी संभाव्य युतीचे संकेतावर आपला रोष व्यक्त करत काँग्रेसवर निशाणा साधला आहे. तर दुसरीकडे, शिवसेना-भाजपाने एकत्र येणे गरजेचं आहे, असेही यावेळी ते म्हणाले आहेत. यापूर्वी गडकरींनी 'शिवसेना-भाजपाला एकत्र येण्याशिवाय दुसरा पर्याय नाही', असे वक्तव्य केले होते. दरम्यान, शिवसेना कोणासोबत युती करणार हे पाहणं आता औत्सुक्याचे ठरले आहे.