Congress Nana Patole News: विधानसभा निवडणुकीच्या आधी जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला असून त्यासाठी प्राप्तीकर विभागाची (इन्कम टॅक्स) मदत घेतली जाणार आहे. अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल, तसेच कुटुंबात चारचाकी गाडी असेल तर अशा महिलांना आता योजनेचा लाभ मिळणार नाही. लाडकी बहीण योजनेसंदर्भात अनेक तक्रारी आमच्याकडे आल्या आहेत. त्याआधारे आम्ही काही पावले उचलत आहोत. पात्र नसलेल्या महिलांनाही या योजनेचा लाभ मिळत आहे. त्यामुळे तक्रारी आलेल्या अर्जांची आम्ही छाननी करणार होणार आहे. यावरून आता विरोधक महायुती सरकारवर टीका करत आहेत.
प्रसारमाध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी लाडकी बहीण योजनेवरून भाजपा महायुती सरकारवर निशाणा साधला. विधानभा निवडणुकीत माता भगिनींची मते घेण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरु करून सरसकट सर्व भगिनींना दीड हजार रुपये दिले आता या सरकार स्थापन झाल्याने भाजपाला बहिणींची गरज राहिलेली नाही म्हणूनच बहिणींना धमक्या देऊन पैसे परत घेण्याची भाषा केली जात आहे हा विश्वासघात आहे. भाजपा महायुती सरकारने दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करत सरसकट सर्व बहिणींना दरमहा २१०० रुपये द्यावेत, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.
छुटूक मुटूक राजकारण्यांचा नंतर विचार करू
संजय राऊतांसंदर्भात विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना नाना पटोले म्हणाले की, संजय राऊत हा आमचा विषय कधी राहिला नाही आणि राहणार नाही. मूळ प्रश्न देशातील शेतकरी अडचणीत आला आहे, हा आहे. देशाला कसे सुरक्षित करता येईल, यावर आमचा भर आहे. महागाईमुळे जनता परेशान झाली आहे. देशाची लोकशाही धोक्यात आली आहे. काँग्रेससमोर देश सर्वप्रथम आहे आणि मग हे छुटूक मुटूक राजकारण. यांचा आम्ही नंतर विचार करू, असा खोचक टोला नाना पटोले यांनी लगावला.
दरम्यान, राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा महायुती सरकार पुरस्कृत असल्याचा मोठा आरोप करत, सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा महायुती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.