काँग्रेसमुळेच युरिया उत्पादन प्रकल्प बंद
By Admin | Updated: February 14, 2016 00:24 IST2016-02-14T00:24:22+5:302016-02-14T00:24:22+5:30
युरिया उत्पादन करणारे देशात ३२ प्रकल्प आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात त्यापैकी आठ प्रकल्प बंद पडले. स्वदेशात खतनिर्मिती करण्याऐवजी युरियाची परदेशातून आयात करण्याचा

काँग्रेसमुळेच युरिया उत्पादन प्रकल्प बंद
अहमदनगर : युरिया उत्पादन करणारे देशात ३२ प्रकल्प आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात त्यापैकी आठ प्रकल्प बंद पडले. स्वदेशात खतनिर्मिती करण्याऐवजी युरियाची परदेशातून आयात करण्याचा काँग्रेसला जास्त पुळका होता. त्यामुळे युरियाच्या किमती वाढल्या होत्या, असा आरोप केंद्रीय खाते व रसायने राज्यमंत्री हंसराज अहेर यांनी केला.
अहमदनगर येथे पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, देशात वर्षभरात २२० लाख टन युरिया उत्पादन केले जाते, तर २० हजार टन युरिया बाहेरच्या देशातून आणला जातो. यामध्ये टनामागे साडेपाच हजार अनुदान दिले जाते. आतापर्यंत ७५ हजार कोटीचे अनुदान वाटप केलेले आहे. सध्या युरियाचा कोणत्याही ठिकाणी तुडवडा नाही. निंबोळीचे तेल वापरून त्याचे आवरण देऊन आता युरिया तयार केला जात आहे. यामुळे युरियाची उपयुक्तता वाढली असून, दूधभेसळीसारखे दुरुपयोग कमी झाले आहेत. अशा आवरणामुळे युरियाचे विरघळणे किंवा हवेत उडण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आतापर्यंत गॅसचा वापर करून युरियाचे उत्पादन केले जात होते. आता कोळशाचा वापर केला जाणार असून, युरियानिर्मितीचे नवे प्रकल्प विदर्भात उभारले जाणार आहेत. चीनमध्ये ८० टक्के युरियाचे उत्पादन कोळशावर केले जाते, भारतात मात्र हे प्रमाण शून्य टक्के आहे. सामान्य जनतेसाठी प्रत्येक आरोग्य केंद्रावर जेनेरिक औषधांचा स्टॉल लावण्याबाबत नियोजन सुरू आहे.
स्वतंत्र विदर्भनिर्मितीला सरकार अनुकूल
छोट्या राज्यांची निर्मिती हे केंद्र सरकारचे धोरण असून, चर्चेमधूनच स्वतंत्र विदर्भाची निर्मिती व्हावी. छोट्या राज्यांची निर्मिती म्हणजे ही काही देशाची फाळणी नाही, असे सांगत स्वतंत्र विदर्भ करण्याबाबत केंद्र सरकार अनुकूल असल्याचे संकेत अहेर यांनी दिले.