Congress News: विधानसभा निवडणुकीत मतदारयाद्यांमध्ये विविध मार्गाने गैरप्रकार करून भाजपाने विजय मिळवला आहे, हे उघड झालेले आहे. निवडणूक आयोगाला हाताशी धरून भाजपाने चोरीच्या मार्गाने सत्ता मिळवली. पण, यापुढे असे प्रकार होऊ नयेत, ते कसे रोखता येतील, यावर उपाय सुचवण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी एक समिती गठीत केली आहे.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली एकूण ७ सदस्यांची ही समिती असून या समितीत अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव प्रफुल्ल गुडदे पाटील, माजी मंत्री अशोकराव पाटील, प्रदेश सरचिटणीस राजेश शर्मा, विधानसभेचे उमेदवार धनंजय शिरीष चौधरी, परिक्षित विरेंद्र जगताप हे सदस्य आहेत तर प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अभय छाजेड हे समन्वयक आहेत.
मतदार याद्यांमधील गैरप्रकाराबाबत काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे रितसर तक्रार दाखल केलेली आहे. पण, आयोगाने अद्याप समाधानकारक खुलासा केलेला नाही. भाजपा निवडणुका जिंकण्यासाठी गैरमार्गाचा वापर करत असून मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळे केले जात आहेत. हे सर्व रोखण्यासाठी ही समिती अभ्यास करून प्रदेश काँग्रेसला अहवाल सादर करेल, अशी माहिती देण्यात आली आहे.