विकासकामुळे मनोरुग्णाचे हाल
By Admin | Updated: June 21, 2015 01:28 IST2015-06-21T01:28:44+5:302015-06-21T01:28:44+5:30
सुविधांवरून विकासकासोबत सुरू असलेल्या वादात मनोरुग्णाचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाला गेली दहा वर्षे हाल सोसावे लागत आहेत.

विकासकामुळे मनोरुग्णाचे हाल
नवी मुंबई : सुविधांवरून विकासकासोबत सुरू असलेल्या वादात मनोरुग्णाचा सांभाळ करणाऱ्या कुटुंबाला गेली दहा वर्षे हाल सोसावे लागत आहेत. १५० सदनिका असलेल्या या इमारतीमध्ये वीज, पाणी अथवा इतर कसलीही सुविधा नसतानाही नरकयातना सोसत हे कुटुंब तिथे वास्तव्य करत आहे.
सीबीडी सेक्टर १५ येथील संजीवन इमारतीमध्ये नवव्या मजल्यावर गेल्या १० वर्षांपासून एक कुटुंब वास्तव्याला आहे. रिशव पटेल हे विकासकाच्या त्रासाचा सामना करत तिथेच वास्तव्य करत आहेत. या काळात त्यांच्या घराची वीज व पाणीपुरवठा देखील खंडित केलेला आहे. त्यामुळे घरातील सदस्यांना नऊ मजले चढून पाणी भरावे लागत आहे. या नरकयातनेतून सुटका मिळवण्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केले, तर काही समाजसेवी संस्थांनाही संपर्क साधला. त्यापैकीच एका संस्थेने त्यांना खोट्या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप या कुटुंबाने केला आहे. राज पटेल (२२) हा त्या कुटुंबातील तरुण मानसिक रुग्ण आहे. आजारपणात मानसिक संतुलन बिघडल्यानंतर तो स्वत:ला दुखापत करून दुसऱ्यांवर देखील हल्ला करतो. त्याने यापूर्वी असे प्रयत्नही केल्याचे त्याची बहीण रिया पटेल यांनी सांगितले. त्यामुळे दहाव्या मजल्यावरील त्यांच्याच एका घरामध्ये राजला स्वतंत्र ठेवले आहे. यादरम्यान उपचारासह त्याला वेळेवर जेवणही दिले जायचे, असेही त्यांनी सांगितले. मात्र दरम्यानच्या काळात या कुटुंबावर आर्थिक संकट कोसळल्याने त्यांना जगणेही असह्य झाले आहे. त्यावरही मात करत हे कुटुंब कसेबसे जगत असताना त्यांना नव्या संकटाला सामोरे जावे लागले आहे.
मदतीसाठी हाक दिलेल्या संस्थेनेच पोलिसांना सोबत घेऊन त्यांच्या घरावर छापा टाकला. सदर कुटुंबाने राज याला जबरदस्तीने डांबून ठेवले असल्याचे सांगत त्याच्या कुटुंबावर आरोप केला. त्यानुसार सीबीडी पोलिसांनीही कर्तव्याचा भाग म्हणून राज याला ताब्यात घेतले. परंतु चौकशीत त्याचा मानसिक आजार असल्याने वेगळे ठेवल्याचे समोर आले. त्याच्या उपचाराची आवश्यक वैद्यकीय कागदपत्रेही कुटुंबाकडे असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मीरा बनसोडे यांनी सांगितले. त्यामुळे संस्थेकडून कुटुंबावर झालेल्या आरोपात तथ्य नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र या प्रकाराचा मानसिक त्रास पटेल कुटुंबाला झाला. त्यांनी घर सोडावे याकरिता यापूर्वीही त्यांच्यावर वेगवेगळ्या प्रकारे दबाव टाकण्यात आला. तसेच वडिलांना खोट्या गुन्ह्यात गुंतवल्याचेही रिया पटेल यांनी सांगितले. तर राजला डांबले असते तर त्याचा उपचार केला नसता अथवा जेवणही दिले नसते. शिवाय त्याला जाणीवपूर्वक वेगळ्या खोलीत ठेवले नसल्याचेही त्यांनी सांगितले. त्यामुळे संस्थेकडून झालेल्या मनस्तापाची तक्रार करणार असल्याचेही रिया पटेल यांनी सांगितले. (प्रतिनिधी)