वृक्षलागवडीसोबत संगोपनावर भर

By Admin | Updated: July 2, 2016 03:42 IST2016-07-02T03:42:27+5:302016-07-02T03:42:27+5:30

ठाणे जिल्ह्यात शासकीय यंत्रणांसह सामाजिक संस्थांनी या वनोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात ठिकठिकाणी १३ लाख वृक्षलागवड केली.

Compilations on the tree with trees | वृक्षलागवडीसोबत संगोपनावर भर

वृक्षलागवडीसोबत संगोपनावर भर


ठाणे : दोन कोटी वृक्षलागवडीच्या उपक्रमास अनुसरून ठाणे जिल्ह्यात शासकीय यंत्रणांसह सामाजिक संस्थांनी या वनोत्सवाचे औचित्य साधून जिल्ह्यात ठिकठिकाणी १३ लाख वृक्षलागवड केली. या उपक्रमाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम माजिवडा येथील स्व. उत्तमराव पाटील जैवविविधता उद्यानात पार पडला. याप्रसंगी डॉ. महेंद्र कल्याणकर म्हणाले की, हे केवळ वृक्षारोपणच नव्हे तर या झाडांचे संगोपन करून ती कशी टिकतील, याकडे लक्ष देणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
सुमारे १३ लाख झाडे म्हणजेच दिलेल्या उद्दिष्टापेक्षा ३ लाख झाडे जास्त लावण्यासाठी संपूर्ण जिल्हा सज्ज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी साकेत येथील कार्यक्रमप्रसंगी सांगितले. या वेळी हे ईश्वरा, सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे... या विश्वप्रार्थनेनंतर उपस्थित मान्यवरांसह सर्वांनी आकाशात हिरवे, पांढरे फुगे सोडण्याचा आनंद घेतला. जैवविविधता उद्यानात विविध प्रकारचे वृक्ष व फुलांचे रोपटे या वेळी लावले. या वेळी महापौर संजय मोरे, आमदार संजय केळकर, अतिरिक्त मुख्य सचिव तथा पालक सचिव के.पी. बक्षी, जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर, हिंदी चित्रपट अभिनेत्री तनिशा मुखर्जी, मराठी चित्रपट अभिनेता उदय सबनीस, संपदा कुलकर्णी आदींनी या वनोत्सव कार्यक्रमात सहभाग घेऊन विद्यार्थ्यांसमवेत जल्लोष केला.
याप्रसंगी सरस्वती विद्यालय, महाराष्ट्र विद्यालय या शाळांच्या विद्यार्थ्यांनी वृक्षदिंडी काढली. ठाणा कॉलेज, एनकेटी, ज्ञानसाधना या महाविद्यालयांचे एनसीसीचे विद्यार्थी यात सहभागी झाले. पोलीस पथकाचा वाद्यवृंद आणि देशप्रेम वाढवणाऱ्या गाण्याच्या सुरात साकेत येथे हा वनोत्सव साजरा झाला.
>कौसाच्या ३५० हेक्टर डोंगरावर
७२ हजार वृक्षलागवड
ठाणे : पावसाची संततधार, हजारोंच्या संख्येने जमलेले विद्यार्थी, नागरिक, विविध संस्थांचे प्रतिनिधी, अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांची गर्दी पाहायला मिळाली, ती कौसाच्या, देवरीपाड्याच्या ३५० हेक्टर डोंगरावर. निमित्त होते, ते ठाणे महापालिकेच्या वतीने आयोजित वृक्षलागवड कार्यक्रमाचे. उपस्थितांनी आपापले गट करून डोंगरमाथ्यावर जाऊन रोपे लावली. यात तरुणांबरोबरच ज्येष्ठांचा सहभागही वाखाणण्यासारखाच होता. दरम्यान, महापालिकेच्या वतीने दोन वर्षांत ५ लाख वृक्षलागवडीचे उद्दिष्ट आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठेवले आहे. या वेळी जिल्ह्याचे पालक सचिव के.पी. बक्षी, महापौर संजय मोरे, खा.डॉ. श्रीकांत शिंदे, आमदार रवींद्र फाटक उपस्थित होते.
>वनोत्सवानिमित्त चित्रकला स्पर्धा
ठाणे : कल्याणच्या बेतूरकरपाडा येथील कै. बापुराव आघारकर प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांच्या रांगोळी, चित्रकला आणि घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आल्या. याशिवाय, वृक्षदिंडी काढून वनोत्सवाची जनजागृती केली. एकतरी झाड लावण्याचे उद्दिष्ट सफल करण्यासाठी विद्यार्थ्यांनी उंबर्डे गावाजवळील भूखंडावर वृक्षारोपण केले. केवळ झाडच न लावता वृक्षसंवर्धनही करण्याचा संकल्प विद्यार्थ्यांनी केला. शाळेच्या मुख्याध्यापिका कमलिनी जीवतोडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी वृक्षलागवड केली. या वेळी संस्थेचे अध्यक्ष दीपक ब्रीद, आत्माराम जोशी, खोपकर, आदींनी यात सहभाग घेतला.

Web Title: Compilations on the tree with trees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.