केडीएमटीकडे आयुक्त रवींद्रन यांचे दुर्लक्ष?
By Admin | Updated: August 2, 2016 03:58 IST2016-08-02T03:58:37+5:302016-08-02T03:58:37+5:30
आयुक्त ई. रवींद्रन हजर राहत नसल्याच्या निषेधार्थ परिवहन समितीतील काँग्रेसचे सदस्य सुरेंद्र आढाव यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

केडीएमटीकडे आयुक्त रवींद्रन यांचे दुर्लक्ष?
कल्याण : केडीएमटीला भेडसावणाऱ्या विविध समस्यांसंदर्भात तीनदा बैठका बोलावूनही आयुक्त ई. रवींद्रन हजर राहत नसल्याच्या निषेधार्थ परिवहन समितीतील काँग्रेसचे सदस्य सुरेंद्र आढाव यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. तर, आयुक्तांच्या अनुपस्थितीमुळे बैठका रद्द कराव्या लागल्याने आता सभापतींसह सर्वपक्षीय सदस्य महापौरांकडे धाव घेणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घ्यावी, अशी विनंती ते करणार आहेत.
केडीएमटीची दुरवस्था, अनुदानाअभावी कर्मचाऱ्यांच्या वेतनाला होणारा विलंब, ताब्यात आलेल्या आगारांच्या जागांचा विकास, नुकताच उघडकीस आलेला बसथांबा घोटाळा, बसला नुकतीच लागलेली आगीची घटना, या सर्व बाबींच्या पार्श्वभूमीवर परिवहन सदस्यांनी आयुक्तांनी विशेष बैठक बोलवावी, अशी विनंती केली होती. सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी तसा पत्रव्यवहारही केला होता. परंतु, आयुक्त नसल्याने तीनदा बैठका रद्द कराव्या लागल्या. आता तर आयुक्त रवींद्रन यांच्याकडे भिवंडी महापालिकेचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आल्याने त्यात ते व्यस्त झाले आहेत.
दरम्यान, बैठका पूर्वनियोजित असूनही ऐनवेळी ते गैरहजर
राहतात, ही बाब योग्य नाही. त्यामुळे त्यांना केडीएमटीच्या दुरवस्थेबाबत कोणतेही गांभीर्य नसल्याचा आरोप कॉँग्रेसचे सदस्य आढाव यांनी केला आहे.
यासंदर्भात सोमवारी त्यांनी सभापती चौधरी यांच्याकडे विचारणा केली असता आपण आयुक्तांशी तीनदा पत्रव्यवहार केला, अशी माहिती चौधरी यांनी त्यांना दिली. सभापतींनी पत्रव्यवहार करूनही आयुक्त बैठक घेत नाहीत, हे चुकीचे आहे. यापुढे असेच चित्र राहिले तर आयुक्तांच्या दालनाबाहेर ठिय्या मांडला जाईल, असा पवित्रा आढाव यांनी घेतला आहे.
यासंदर्भात, सभापती चौधरी म्हणाले, एकंदरीतच वातावरण पाहता आयुक्तांना केडीएमटीकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे आता महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक बोलावून आयुक्तांना त्या बैठकीला उपस्थित राहण्यास सांगितले जाईल. ‘लोकमत’ने यासंदर्भात आयुक्त रवींद्रन यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)
>आगप्रकरणी व्यवस्थापक अडचणीत
केडीएमटी बसना आग लागण्याचे सत्र सुरूच असून गणेशघाट आगारातून बाहेर पडलेल्या बसला आग लागल्याची घटना शुक्रवारी घडली.
या घटना वारंवार घडत असून तिला कार्यशाळा व्यवस्थापक अनंत कदम जबाबदार आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेनेचे परिवहन सदस्य दत्तात्रेय खंडागळे यांनी आयुक्त ई. रवींद्रन यांच्याकडे केली आहे.
या आगीच्या पार्श्वभूमीवर आयशर कंपनीच्या बसची तपासणी करण्याचे आदेश सभापती भाऊसाहेब चौधरी यांनी उपक्रमाचे व्यवस्थापक देविदास टेकाळे यांना दिले आहेत.
>चालक, वाहकांच्या प्रसंगावधानामुळे आग पसरली नाही
इंजीनमधील वायरमध्ये शॉर्टसर्र्किट झाल्याने आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मोहने-कल्याण मार्गावर जाणाऱ्या आयशर कंपनीच्या मिडीबसला आग लागल्याची घटना मुरबाड रोडवर घडली, तेव्हा बसमध्ये १२ प्रवासी होते. चालक आणि वाहकांनी प्रसंगावधान दाखवल्याने आग पसरली नाही.
कोणालाही दुखापत झाली नाही. गाडीतील अग्निरोधक यंत्रातून आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. २१ जुलैलाही उपक्रमाच्या गणेशघाट आगारात उभी असलेली बस सुरू करताना तिने पेट घेतला होता. ही गाडीही आयशर कंपनीचीच होती.
या घटनांना प्रथमदर्शनी कार्यशाळा व्यवस्थापक कदम हेच जबाबदार असल्याचा आरोप सदस्य खंडागळे यांनी केला आहे. या बसेस वारंवार पेट घेत असल्याने प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असून वादग्रस्त कारकीर्द असलेल्या कदम यांना हटवून कठोर कारवाईची मागणी होत आहे.
>प्रवास बनतोय धोक्याचा
‘लोकमत’ने नुकतीच ‘रिपोर्टर-आॅन दी स्पॉट’ च्या माध्यमातून केडीएमटी उपक्रमाची दुरवस्था चव्हाट्यावर आणली होती. गणेशघाट आगारातील कारभाराकडे लक्ष वेधले होते. तेथील हायमॅक्स चार वर्षांपासून बंद असल्याने रात्रीच्या सुमारास कार्यशाळेत गाड्यांच्या देखभाल-दुरुस्तीची कामे होत नसल्याची बाब उघड झाली होती. परिणामी, गाड्यांमध्ये वारंवार बिघाड होऊन आग लागण्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. जेएनएनयूआरएम योजनेंतर्गत २०१३ मध्ये परिवहनच्या ताफ्यात टाटा कंपनीच्या दाखल झालेल्या बसला आग लागण्याचा घटना यापूर्वी घडल्या आहेत. शॉर्टसर्किटने आग लागण्याचे कारण सातत्याने पुढे केले जात असले, तरी गेल्या वर्षी दोन गाड्यांनी पेट घेतला होता. त्या गाड्या टाटा कंपनीच्याच होत्या. २८ डिसेंबर २०१३ ला कल्याण पश्चिमेकडील बैलबाजार परिसरात मलंगगड-कल्याण या बसने पेट घेतला होता. या बसमध्ये ४१ प्रवासी होते. चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानाने कोणालाही दुखापत झाली नाही. ३ आॅक्टोबर २०१४ ला अंबरनाथ तालुक्यातील कुशिवली येथे केडीएमटीच्या बसला मोठी आग लागली होती. या आगीत बसचा केवळ सांगाडा उरला होता. आतील प्रवासी वेळीच बसमधून बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेला महिना उलटत नाही तोच १० नोव्हेंबर २०१४ रोजीही एका बसमधून धूर आल्याची घटना शिवाजी चौकात घडली होती.