स्मृती इराणी यांच्या प्रतिमेचे दहन
By Admin | Updated: June 2, 2015 02:16 IST2015-06-02T02:16:01+5:302015-06-02T02:16:01+5:30
चेन्नई आयआयटीतील आंबेडकर-पेरियार या विद्यार्थी संघटनेवरील बंदीचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मनुष्यबळ

स्मृती इराणी यांच्या प्रतिमेचे दहन
मुंबई : चेन्नई आयआयटीतील आंबेडकर-पेरियार या विद्यार्थी संघटनेवरील बंदीचा निषेध करीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाच्या कार्यकर्त्यांनी आज केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांच्या प्रतिमेचे दहन केले. केंद्र सरकारवर टीका केली म्हणून दलित विद्यार्थ्यांच्या गटावर बंदी घालणे हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाला आहे असून, या विद्यार्थ्यांवरील बंदी त्वरित उठवावी, अशी मागणी रिपाइंचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष व माजी सनदी अधिकारी उत्तम खोब्रागडे यांनी पत्रकार परिषदेत केली.
मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या निर्देशानंतर चेन्नई आयआयटीच्या प्राचार्यांनी या गटावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला होता. देशभरातून या विरोधात आवाज उठवला जात आहे. केवळ केंद्र सरकारवर व त्यांच्या धोरणांवर टीका केल्याने बंदी घालणे ही अत्यंत चुकीची बाब आहे. देशाच्या संविधानाने सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे़ बोलण्याचा अधिकार हा लोकशाहीचा आत्मा आहे. आंबेडकर-पेरियार गटावरील बंदी राज्यघटनेतील मूलभूत अधिकारांचे उल्लंघन असल्याचा आरोप खोब्रागडे यांनी केला.
विद्यापीठे, आयआयटी अशी ठिकाणे विद्यार्थ्यांना आपले मत मांडण्याचे एक व्यासपीठ असते, त्यामुळे अशा प्रकारची बंदीची कारवाई रोखण्याची आवश्यकता आहे. दलित विद्यार्थ्यांच्या संघटनेवर अशाप्रकारे बंदी घालणे हे घटनाविरोधी आहे़ सरकारने असे प्रकार त्वरित रोखावेत व यापुढे असे प्रकार होणार नाहीत याची काळजी घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सदर विद्यार्थी गटावरील बंदीविरोधात रिपाइं तीव्र आंदोलन करेल, असा इशारा खोब्रागडे यांनी या वेळी दिला.