डोंबिवलीत प्रदूषणाचा ‘रंग’
By Admin | Updated: September 20, 2016 03:56 IST2016-09-20T03:56:25+5:302016-09-20T03:56:25+5:30
पाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात निकषांच्या आधारे प्रक्रिया होत नसल्याने ८६ रासायनिक कारखाने बंद करण्यात आले आहेत.

डोंबिवलीत प्रदूषणाचा ‘रंग’
डोंबिवली : कारखान्यांतून बाहेर पडणाऱ्या रसायनमिश्रित पाण्यावर सांडपाणी प्रक्रिया केंद्रात निकषांच्या आधारे प्रक्रिया होत नसल्याने ८६ रासायनिक कारखाने बंद करण्यात आले आहेत. असे असतानाही रामचंद्र नाल्यात सोमवारी रसायनमिश्रित लाल रंगाचे पाणी वाहताना दिसून आले. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना प्रदूषणाचा त्रास झाला.
रामचंद्रनगरातील रहिवासी गिरिजा मराठे म्हणाल्या की, ‘नाल्यातून मोठ्या प्रमाणात लाल रंगाचे पाणी वाहत आहे. हे पाणी रासायनिक कारखान्यातून सोडण्यात आले आहे. ते सांडपाणी नसून रसायनमिश्रित सांडपाणी आहे. त्याचा त्रास आजूबाजूच्या नागरिकांना झाला आहे. माझ्याही घशाला त्रास झाला आहे. अशाच प्रकारचा त्रास २८ आॅगस्टलाही या परिसरातील नागरिकांना झाला होता. या वेळी नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली होती. मात्र, त्यांनी त्याची दखल घेतली नाही.’
राष्ट्रीय हरित लवादाने दणका दिल्यावर प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कल्याण कार्यालयाने डोंबिवलीतील ८६ रासायनिक कारखाने बंद करण्याची नोटीस २ जुलैला दिली आहे. कारखानाबंदीवरील नोटिसांना लवादाने स्थगिती दिलेली नाही. त्यामुळे कारखाने बंद आहेत. कारखानदारांच्या याचिकेवर २३ सप्टेंबर रोजी सुनावणी आहे. कारखाने बंद असताना नाल्यात लाल रंगाचे रसायनमिश्रित पाणी कसे काय आले. याचाच अर्थ कारखान्यांतून छुपे उत्पादन सुरू आहे. (प्रतिनिधी)
>वाहिनी फुटली
नागरिकांच्या २८ तारखेच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण मंडळाने एमआयडीसीला नोटीस बजावून कारखान्यांचे सांडपाणी सोडण्याचे चेंबर सिमेंट लावून बुजवण्याचे आदेश दिले आहेत. ती कार्यवाही सुरू होती. इतक्या कठोर कारवाईनंतर पुन्हा प्रदूषित पाणी नाल्यातून कसे वाहते, असा प्रश्न आहे. दरम्यान, टेम्पोनाका येथे सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी फुटल्याचे सांगण्यात आले.