‘कोकण पदवीधर’साठी कांटे की टक्कर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 06:24 AM2018-05-28T06:24:29+5:302018-05-28T06:24:29+5:30

कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवायच्या सदस्याकरिता होणाऱ्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत.

 A collision collision for 'Konkan graduate' | ‘कोकण पदवीधर’साठी कांटे की टक्कर

‘कोकण पदवीधर’साठी कांटे की टक्कर

Next

- अजित मांडके, ठाणे

कोकण पदवीधर मतदारसंघातून विधान परिषदेवर पाठवायच्या सदस्याकरिता होणाऱ्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. भाजपाच्या या परंपरागत मतदारसंघाला मागीलवेळी खिंडार पाडणारे राष्ट्रवादीचे निरंजन डावखरे हे यावेळी भाजपाचे उमेदवार असतील. राष्ट्रवादीतून कुणाला उमेदवारी मिळणार ते स्पष्ट नसले तरी चित्रलेखा पाटील यांचे नाव आघाडीवर असून नजीब मुल्ला यांना उमेदवारीचे गाजर दाखवल्याची चर्चा आहे. मागील वेळी
डावखरे यांना मदत करणारी शिवसेना यावेळी भाजपाचे नाक कापण्याकरिता लढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे ही निवडणूक चुरशीची,
अटीतटीची होणार आहे.

येत्या २५ जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. त्याच्या घोषणेपूर्वी राष्टÑवादीचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे यांनी राष्टÑवादीच्या सर्वच पदांचा राजीनामा देत भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपाने त्यांना आमदारकीचे तिकीट देऊ केले आहे. परंतु, त्यांच्या उमेदवारीवरून भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भाजपामध्ये गेल्या चार वर्षांत आयात उमेदवारांना मानाचे पान तर जनसंघापासून पक्षात हयात घालवलेल्यांच्या पदरी उपेक्षा, अशी विसंगती निर्माण झाली आहे. डावखरे हे मागील निवडणुकीत भाजपाविरोधात लढत असल्याने शिवसेनेनी त्यांना मदत केली होती. मात्र आता ते भाजपाचे उमेदवार असल्याने व सध्या भाजपा-शिवसेनेचे नाते विळ््या-भोपळ््याचे असल्याने शिवसेना डावखरे यांच्या विरोधात उमेदवार देणार हे स्पष्ट दिसत आहे. त्यामुळे डावखरे यांचा या मतदारसंघात किती प्रभाव पडतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या निवडणुकीतील मतदार सुजाण आहे. शिवाय तो वैचारिकदृष्ट्या बांधलेला असतो. याचा प्रत्यय कोकणातील नेते नारायण राणे यांनाही आला होता. त्यामुळे निरंजन यांचे डाव किती खरे ठरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
कोकण पदवीधर मतदारसंघावर १९८८ पासून ते २०१२ पर्यंत केवळ भाजपाचेच वर्चस्व राहिले आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेने निरंजन यांना सहकार्य केल्याने भाजपाचे उमेदवार संजय केळकर यांचा पराभव झाला. डावखरे यांना २७ हजार, तर केळकर यांना २२ हजार मते पडली होती. निरंजन यांचे पिताश्री स्वर्गीय वसंत डावखरे यांच्या वेगवेगळ््या पक्षातील ऋणानुबंधामुळे भाजपाकडून ही जागा खेचून घेण्यात ते यशस्वी ठरले. मागील निवडणुकीत एक लाख नऊ हजार मतदार नोंदले होते. यंदा पुन्हा नव्याने नोंदणी सुरू झाली आतापर्यंत ९५ हजारांच्या आसपास मतदारांची नोंदणी करण्यात आली आहे. परंतु, आता वसंत डावखरे यांच्या निधनानंतर निरंजन यांच्या राजकीय जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यात राष्ट्रवादीतून त्यांना अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने वर्षभरापासून ते पक्षाच्या कार्यक्रमांपासून दूर राहिले होते. राष्टÑवादीत राहून आपली डाळ शिजणार नसल्याचे त्यांनी केव्हाच हेरले असावे. सध्या देशभरात सुरू असलेली भाजपाची सरशी पाहता त्यांनी राष्टÑवादीला रामराम करण्याचा निर्णय घेतला असावा. अखेर त्यांनी राष्टÑवादीचे घड्याळ फेकून भाजपाचे कमळ हाती घेतले आहे.
डावखरे यांच्या अचानक भाजपा प्रवेशामुळे कोकण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीची गणिते बदलली आहेत. शहर भाजपाचे अध्यक्ष संदीप लेले यांनी तर आम्ही काय दुसºयांचीच भांडी घासत बसायचे का, केवळ सतरंज्या उचलायच्या का, असा थेट आरोप केला आहे. रत्नागिरीतून विनय नातू यांनी भाजपाकडे तिकीट मागितले होते. डावखरे यांच्या प्रवेशामुळे इच्छुकांत नाराजीचा सूर उमटणे स्वाभाविक आहे. राज्यात गेली १५ वर्षे काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता होती. त्यावेळी भाजपा, शिवसेनेची मंडळी सत्तेबाहेर होती. सत्ता आल्यावर काँग्रेस, राष्ट्रवादीतील काही धनाढ्य मंडळींनी पैशाच्या जोरावर भाजपात उमेदवाºया, पदे मिळवल्याने निष्ठावंतांचा जळफळाट होणे नैसर्गिक आहे. मात्र अशी नाराज मंडळी आता कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. डावलले गेलेल्यांनी मुकाटपणे हा निर्णय स्वीकारला तर प्रश्नच संपला. मात्र आज ना उद्या या असंतोषाचा फटका भाजपाला बसणार आहे. शिवसेनेमध्येही याचे पडसाद उमटल्याचे दिसून आले. शिवसेनेतून संजय मोरे यांचे नाव आघाडीवर असून ते कोकणातीलच असल्याने त्यांचा शिवसेनेला फायदा होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. भाजपाच्या नाराज नातू यांना गळाला लावण्याचा प्रयत्न शिवसेनेच्या एका गटाकडून सुरू झाला आहे. त्यामुळे मोरे नाराजी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. एकूणच कधी नव्हे ती यंदा प्रथमच या निवडणुकीला दलबदलुंमुळे अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. मागील निवडणुकीत शिवसेना आणि भाजपा युतीत लढली होती. परंतु, यंदा मात्र युती नसल्याने शिवसेना आणि भाजपाचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. त्यात आता राष्टÑवादीची पोकळी कोण भरून काढणार, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. राष्टÑवादीकडून चित्रलेखा पाटील आणि आता नजीब मुल्ला यांची नावे चर्चेत आहेत. चित्रलेखा या राष्ट्रवादीचे खजिनदार हेमंत टकले यांच्या कन्या व शेकापचे नेते जयंत पाटील यांच्या स्नुषा आहेत. त्या रिंगणात उतरल्या तर सर्वचदृष्ट्या प्रबळ उमेदवार ठरतील. मुल्ला यांना गाजर दाखवण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.
शिवसेना विरुद्ध भाजपा आणि राष्टÑवादी असा सामना रंगणार आहे. यामध्ये विजय कोणाचा होणार, हे पाहणे महत्त्वाचे आहे. या निवडणुकीत मतदारांची कितीही नोंदणी केली, तरी मागील काही वर्षांचा इतिहास पाहता ३५ टक्क्यांच्या आसपासच मतदार मतदान करतात. त्यामुळे फारच थोड्या मतांच्या फरकानी विजय होतो. ठाणे जिल्हा यामध्ये आघाडीवर असून या जिल्ह्यातील मतांना या निवडणुकीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामधील नवी मुंबई या शहराच्या मतांना मात्र यंदा चांगलीच मागणी असणार आहे. परंतु, नवी मुंबईचे दान कोणाच्या पदरात पडणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नाईक-डावखरे नाते सर्वश्रूत आहे. मात्र नजीब मुल्ला यांना पक्षाने उमेदवारी दिली तर जितेंद्र आव्हाड यांचे निकटवर्तीय राहिलेल्या नजिब यांना नाईक यांची कशी साथ लाभेल, हाही मुद्दा आहे. कोकणातील मतदारांचा अनुभव नारायण राणे कुटुंबीयांना आला आहे. एकेकाळी राणे म्हणजे कोकण आणि कोकण म्हणजे राणे, असे समीकरण होते. राणे यांनी शिवसेना सोडली आणि ही समीकरणे बदलली. सुरुवातीला राणे यांना सुजाण कोकणी मतदारांनी कौल दिला खरा, परंतु नंतर मात्र याच मतदारांनी त्यांना घरचा रस्ता दाखवला. आता त्यांनी भाजपाबरोबर घरोबा केला आहे. परंतु मतदारांचा कौल पाहता, त्यांनी स्वत:चा स्वाभिमान पक्ष स्थापन केला आहे. मागील वेळेस शिवसेनेच्या मदतीने डावखरे यांनी गड सर केला होता. तेव्हां ते राष्टÑवादीत होते, परंतु आता त्यांनी पक्ष बदलून भाजपाचे कमळ हाती घेतल्याने राष्ट्रवादीचे उमेदवार या नात्याने मिळवलेली किती मते आपल्याकडे निरंजन वळवतात यावर त्यांचे यश अवलंबून राहील. अन्यथा भाजपा पुन्हा हा मतदारसंघ गमावण्याची भीती आहे.

Web Title:  A collision collision for 'Konkan graduate'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.