महाविद्यालय मान्यतेवरून खटके उडणार
By Admin | Updated: May 15, 2015 02:32 IST2015-05-15T02:32:44+5:302015-05-15T02:32:44+5:30
नवीन महाविद्यालयांना आणि तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. या निर्णयावरुन या

महाविद्यालय मान्यतेवरून खटके उडणार
मुंबई : नवीन महाविद्यालयांना आणि तुकड्यांना मान्यता न देण्याचा निर्णय उच्च व तंत्रशिक्षण विभागाने नुकताच घेतला आहे. या निर्णयावरुन या विभागाचे मंत्री विनोद तावडे आणि राज्यमंत्री रविंद्र वायकर यांच्यामध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. नवीन महाविद्यालयांना मान्यता मिळणार नसल्याने राज्यातील हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार असल्याने युवा सेनेने या निर्णयाला तीव्र विरोध दर्शविला आहे.
दरवर्षी राज्यातील विद्यापीठे महाविद्यालयांकडून नवीन महाविद्यालये सुरु करणे आणि तुकडीवाढीचे प्रस्ताव मागवतात. त्यानुसार राज्यातील विद्यापीठांनी महाविद्यालयांचे प्रस्ताव मंजूर करुन ते शासनाकडे मंजूरीसाठी पाठविले आहेत. असे असतानाच उच्च व तंत्रशिक्षण विभागाने रिक्त जागांचे कारण पुढे करत नवीन महाविद्यालय आणि तुकडीवाढ देण्यात येणार नसल्याचा निर्णय घेतला. युवा सेना संघटनेने या निर्णयाला विरोध केल्यानंतर वायकर यांनी शिक्षण संस्थाचालक आणि विद्यापीठांच्या बीसीयुडीचे संचालक यांची गुरुवारी मंत्रालयात बैठक घेतली. या बैठकीत संस्थाचालकांनी नवीन महाविद्यालये, तुकड्यांसाठी लाखो रूपयांचा खर्च केल्याचे, वायकर यांच्या निदर्शनास आणून दिले. यावेळी वायकर यांनी आपल्याला अंधारात ठेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचे बैठकीला उपस्थितांनी सांगितले.