पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडीमध्ये कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती. याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकार अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार असल्याची मोठी घोषणा केली आहे.
"एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकार असताना अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय आपण घेतला. राम शिंदे आणि आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजच्या कार्यक्रमासाठी निमंत्रित केलं होतं. यासाठी मी जेव्हा पंतप्रधान मोदींना भेटलो आणि सांगितलं की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमासाठी निमंत्रित करायचं आहे. तेव्हा पंतप्रधान मोदी म्हणाले की, माझ्यासमोर हा प्रश्न आहे की एकीकडे जन्मस्थळ आणि दुसरीकडे कर्मस्थळ."
"छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला देदीप्यमान इतिहास माहिती झाला"
"मोदींनी सांगितलं की, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कर्मस्थळावर मी सभा घेण्याचं ठरवलं आहे. मात्र पुढच्यावेळी जन्मस्थळावर नक्की येईल असा विश्वास पंतप्रधानांनी आपल्याला दिला. कधी-कधी इतिहास फार क्रूर असतो. छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास हा जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता दुर्देवाने चित्रपटाची निर्मिती झाली आणि छावा चित्रपटानंतर आजच्या पिढीला देदीप्यमान इतिहास माहिती झाला. याआधीही माहिती होता पण जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यात आपण कुठेतरी अपयशी झालो होतो."
"अहिल्यामातांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट तयार करणार"
"आमच्या लक्षात आलं की चित्रपट हे असं माध्यम आहे त्यामधून इतिहास सर्वांपर्यंत पोहोचू शकतो. त्यामुळे आपल्या मंत्रिमंडळाने असा निर्णय घेतला आहे की, अहिल्यामातांच्या जीवनावर बहुभाषिक चित्रपट आपण तयार करणार आहोत. सर्व भाषांमध्ये तयार करणार आहोत, जेणेकरून महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतात अहिल्यामातांचं चरित्र, त्यांचं कर्तृत्व आणि देशावरचे उपचार हे शेवटच्या माणसापर्यंत पोहोचले पाहिजे हा आपला प्रयत्न आहे. अहिल्यामातांकडून प्रेरणा घेऊन आपण काम करत आहोत" असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.