न्यायमूर्तींची इंटरनेट सेवा बंद करा

By Admin | Updated: August 11, 2015 01:46 IST2015-08-11T01:46:57+5:302015-08-11T01:46:57+5:30

आरडीएक्सद्वारे मुंबईत मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या याकूब मेमनला फाशी द्यायला २२ वर्षे लागली. सर्वसामान्यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात, पायऱ्या झिजवाव्या लागतात.

Close the internet services of the judges | न्यायमूर्तींची इंटरनेट सेवा बंद करा

न्यायमूर्तींची इंटरनेट सेवा बंद करा

ठाणे : आरडीएक्सद्वारे मुंबईत मृत्यूचे तांडव घडविणाऱ्या याकूब मेमनला फाशी द्यायला २२ वर्षे लागली. सर्वसामान्यांना न्यायालयात हेलपाटे मारावे लागतात, पायऱ्या झिजवाव्या लागतात. याकूबसाठी पहाटे तीन वाजता सर्वोच्च न्यायालय सुनावणीला बसतात. याकूबच्या सुनावणीला २२ वर्षे आणि गणेशोत्सवातील मंडप आणि डिजेचा निर्णय एकदम झटकन? दहीहंडी म्हणे फक्त २० फूटापर्यंत बांधायची. मग ती घरातच फोडायची का, असे सवाल करुन न्यायालयांच्या निर्णयांवर राज ठाकरे यांनी सडकून टीका केली.
न्यायमूर्तींची वर्तमानपत्रे, नेट सर्व काढून घ्या मग पहा निर्णय कसे वेगाने होतील, असे सांगून प्रलंबित खटल्यांबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. न्यायालयाचा आदर आहेच. तो घालवू नका इतकीच अपेक्षा आहे. राम जेठमलानी, नसरुदीन शहा हे याकुबची फाशी टाळण्यासाठी पत्र देतात? देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचे वकील पत्र घेणाऱ्या जेठमलांनींना तर कधीच माफ करणार नाही. छोटा शकीलच्या मुलाखती माध्यमे देतात. याकुबने काय खाल्ले, तो काय बोलला हे सर्व प्रसिद्ध होते. हा काय तमाशा आहे, सलमान खानच्या खटल्यालाही १२ वर्षे लागली. कसले संशोधन सुरु होते, असा सवाल त्यांनी केला. आवैसी बंधूंवरही त्यांनी सडकून टीका केली. त्यांनी जर महाराष्ट्रात वेडेवाकडे करण्याचा प्रयत्न केला तर गाठ राज ठाकरेंशी गाठ आहे. रस्त्यावर फोडून काढेन, असा इशाराही दिला.
जिथे मुख्यमंत्री राहिले त्या घरातील महिलेने आत्महत्या केली. दुष्काळ, सिंचन आणि टोलचे प्रश्न तसेच आहेत. फक्त तोंडे बदलली. साध्या अंतर्गत बदल्यांसाठी १०० कोटींचा भ्रष्टाचार. देवेंद्र फडणवीस माणूस म्हणून चांगले. पण त्यांचेही हात पाय बांधलेत. जाती पातीचेही र ाजकारण केले जातेय. त्यामुळे जाती पातीला थारा देऊ नका, मराठी आहात महाराष्ट्रासाठी झटा... जिथे जिथे मराठी माणसांवर अन्याय होईल, तिथे तिथे अन्यायाला तीव्र प्रतिकार झालाच पाहिजे, असा सल्ला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोमवारी ठाण्यातील कार्यकर्त्यांना दिला.
गडकरी रंगायतन येथे कार्यकर्ते आणि नेत्यांच्या गर्दीने खचाखच भरलेल्या मेळाव्यात त्यांनी भाजप, राष्ट्रवादी आणि न्यायालय आणि प्रसार माध्यमांचा खरपूस समाचार घेतला. तत्पूर्वी, राज यांनी गडकरी रंगायतन बाहेर सेल्फी केंद्राचे उद्घाटन केले. ते म्हणाले, मराठी राजभाषा आहे, हे ५५ वर्षांनतर सरकारला कळाले. मुंबई ठाण्यात रिक्षा चालकांसाठी नविन परमिट दिली जात असल्याचे मराठी तरुणांना माहितच नाही. यात केवळ ६० टक्के उत्तर भारतीय तर ३० ते ४० टक्के बांग्लादेशी आहेत. यांना पोसायचे काम भाजपावालेच करीत आहेत. बनावट आधारकार्ड वाटतांना एका भाजपच्याच कार्यकर्त्याला पकडल्याचा दाखलाही त्यांनी दिला. जे काँग्रेसने केले तेच भाजपवाले करताहेत. कोकणात अतिरेकी घुसल्याच्या वृत्ताचाही त्यांनी चांगलाच समाचार घेतला. मोदी मात्र मन की बात की मौन की बात करताहेत. मोदींनी बोलले पाहिजे की, अतिरेक्यांसदर्भात भाष्य करुन नागरिकांना भयमुक्त केले पाहिजे. ते नुसते गुजरात गुजरात जप करीत राहिले तर मग देशाचे काय होणार. (प्रतिनिधी)

मराठी मुलांनाच नोक-या.. 
- मुलांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजेत, त्यांना रिक्षांचे परवानेही मिळाले पाहिजेत. यासाठी मनसेच्या वाहतूक सेनेने जागरुक राहिले पाहिजे. जिथे जिथे अन्याय दिसेल, मराठी माणसाला त्रास होईल, तिथे तुम्ही मशालीसारखे रहा.त्यांना आधार द्या नुसते कार्ड बनू नका असा सल्ला त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.
- मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात कंपन्या जरुर आणाव्यात पण तिथे मराठी मुलांनाच नोकऱ्या दिल्या पाहिजेत, असा इशाराच त्यांनी सरकारला दिला.

आव्हाडांचा उल्लेख वळवळया..
राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच अनेक समस्या निर्माण झाल्याचा आरोपही ठाकरे यांनी यावेळी केला. ९२ वर्षांच्या बाबासाहेब पुरंदरे यांचा जातीपातीच्या राजकारणात नाहक बळी घेतला जातोय. यशवंतराव चव्हाणांनी शिवाजी महाराजांच्या जन्मतिथीबद्दल समिती नेमली होती. पण यांना चर्चा नको.
जातीचे विष पेरले जातेय. आधी पुरंदरेंचे नाव महाराष्ट्र भूषण म्हणून आणले जाते. नंतर त्यांच्यावर राजकारण केले जाते. राष्ट्रवादी नावाचा पक्ष आला तेंव्हापासूनच हे सर्व सुरु आहेत. शरद पवार हे कसले जाणता राजा आहेत.
ज्या महाराष्ट्राने चांगला विचार दिला, तोच महाराष्ट्र जाती पातीत खितपत पडलाय. ठाण्यातले ते एक वळवळतय, असेही पुरंदरे यांच्यावर टीका करणाऱ्या आव्हाड यांचा उल्लेख केला.

उद्धव आणि माझी भेट ही मिडीयाचीच बातमी...
एका फार्महाऊसवर उद्धव आणि माझी भेट झाल्याची बातमी माध्यमांनीच पेरली. त्यांना पेरायला कोण लावतेय? असा सवाल करीत भाजपाला घाबरविण्यासाठी या बातम्या पसरविल्या जातायेत.
राज यांचे भाषण सुरु असतांनाच ठाण्याच्या शांतीनगरच्या एका महिलेने मध्येच व्यतय आणण्याचा प्रयत्न केला. इमारती पडतायेत, पालिकेचे अधिकारी न्याय देत नसल्याचे त्यांचे म्हणणे होते. या महिलेची कैफियत नंतर त्यांनी ऐकून त्यासंदर्भात शहराध्यक्ष राजेश जाधव यांना लक्ष घालण्याचे आदेश त्यांनी दिले.

Web Title: Close the internet services of the judges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.