मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा उफाळला
By Admin | Updated: March 2, 2017 02:08 IST2017-03-02T02:08:17+5:302017-03-02T02:08:17+5:30
मुंबई पालिका निवडणुकीआधी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला होता

मुंबई काँग्रेसमधील वाद पुन्हा उफाळला
मुंबई : मुंबई पालिका निवडणुकीआधी काँग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला होता आणि हा वाद शांत होत असतानाच आता पुन्हा एकदा वाद उफाळून आला आहे. पालिकेतील खराब निकालांच्या पार्श्वभूमीवर माजी खासदार गुरुदास कामत यांनी मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांना कार्यकारिणीची बैठक घेण्याची विनंती केली आहे.
बंद दरवाजामागे किंवा मोकळ्या मैदानात काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यास तयार असल्याचेही पत्रकाद्वारे स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे अंतर्गत वाद निर्माण झाले. अनेक वादविवादांनंतर निवडणूक जवळ येताच काँग्रेस नेत्यांकडून एकत्रित येत प्रचारही करण्यात आला. त्यानंतर पालिका निवडणुकीत काँग्रेसचे ३१ उमेदवारही निवडून आले. परंतु त्यानंतर संजय निरुपम यांनी आरोपांच्या फैरी झाडत मुंबई काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामाही दिला होता. परंतु हा राजीनामा स्वीकारण्यात आला नाही. (प्रतिनिधी)
सर्व वादविवादानंतर पालिका निवडणुकांसाठी निश्चित केलेल्या प्रचार पद्धतीवर तपशीलवार चर्चा करण्यासाठी तसेच सर्व मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी आणि खराब निकालांच्या पार्श्वभूमीवर प्रसारमाध्यमे व काँग्रेस नेतृत्वाकडे सपशेल खोटे सांगण्याऐवजी त्यांची जबाबदारी निश्चित करावी यासाठी कामत यांनी कार्यकारिणीची बैठक घेण्याची विनंती केली आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांसमोरच सर्व मुद्द्यांवर चर्चा झाल्यास कार्यकर्ते गोंधळून जाण्याऐवजी सत्य परिस्थितीची जाण त्यांना होईल, असे पत्रातून सांगण्यात आले आहे.