शहराला गरज ‘तिसऱ्या डोळ्याची’

By Admin | Updated: September 4, 2014 00:57 IST2014-09-04T00:57:06+5:302014-09-04T00:57:06+5:30

‘युग’ हत्याकांडानंतर पुन्हा एकदा असुरक्षितता चिंतेचा विषय ठरला आहे. गुन्हेगारांचे वाढते मनोबल अकार्यक्षमतेचे प्रतीक मानले जात आहे. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी

The city needs a 'third eye' | शहराला गरज ‘तिसऱ्या डोळ्याची’

शहराला गरज ‘तिसऱ्या डोळ्याची’

‘युग’ हत्याकांडानंतर चौका-चौकात सीसी टीव्ही कॅमेऱ्याची मागणी
नागपूर : ‘युग’ हत्याकांडानंतर पुन्हा एकदा असुरक्षितता चिंतेचा विषय ठरला आहे. गुन्हेगारांचे वाढते मनोबल अकार्यक्षमतेचे प्रतीक मानले जात आहे. पोलीस यंत्रणा अधिक सक्षम आणि कार्यक्षम करण्यासाठी तत्काळ उपायांची गरज व्यक्त होत आहे. यासोबतच चौकाचौकात सीसीटीव्ही कॅमेर लावण्याला प्रथम प्राधान्य द्यावे अशी, मागणी पुन्हा एकदा समोर आली. विशेष म्हणजे ३० लाख लोकसंख्येच्या शहरात फक्त दोन चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.
ज्याच्याकडे चोरी झाली, त्याला सीसी टीव्ही कॅमेरा का लावला नाही? असे आता पोलीसच विचारतात. कुठलीही घटना घडली तरी कुठे सीसीटीव्ही होता का, याची आधी पाहणी करतात. ‘युग’ हत्याकांडातही पोलिसांनी एका सीसी टीव्हीच्या कॅमेऱ्यातून आरोपीचे फुटेज मिळविले. यामुळे शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्याची गरज असल्याची जाणीव आता सर्वसामान्यांना होऊ लागली आहे. मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर महत्त्वाच्या ठिकाणी ‘सीसी टीव्ही कॅमेरे’ बसविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार मुंबईमध्ये कॅमरे लावण्याचे काम सुरू झाले. त्यानंतर पुणे आणि इतरही शहरात सुरू झाले. परंतु उपराजधानी अद्यापही मागे आहे. मागील काही दिवसांत पोलिसांच्या सूचनेनुसार महापालिकेने शहरातील महत्त्वाच्या चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला होता.
याला मंजुरी मिळाल्याचेही समजते. साधारण ५० कोटींच्या या कामात शहरातील १२८ चौकात सीसीटीव्ही लावले जाणार होते. परंतु अद्यापही प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही.
शहरात सद्यस्थितीत अत्यंत संवेदनशील चौक असलेल्या गांधी गेट आणि संविधान चौकात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. परंतु हे कॅमेरे अत्यंत साधारण आहेत. त्यांचे कार्यक्षेत्रही फक्त पुतळ्यांपर्यंतच मर्यादित आहे. उपराजधानीत दोनशेवर चौक संवेदनशील चौक म्हणून ओळखले जातात. यातील निम्म्या चौकातही सीसीटीव्ही कॅमेरे लागले तर पोलिसांना सुरिक्षतता राखण्यासाठी मदत होईल. (प्रतिनिधी)
एका चौकात हवे पाच कॅमेरे
सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील तज्ज्ञाने सांगितले, एका चौकात साधारण चार कॅमेरे असणे आवश्यक आहे. यात ‘६० फ्रेम रेकॉर्ड’ होणाऱ्या ‘स्पीड डोम फीक्स’ कॅमेऱ्यांसोबतच घुमता व ‘झूम’ होणाऱ्या कॅमेऱ्याची गरज आहे. कॅमेऱ्यासोबतच त्यांचे फुटेज पाहण्यासाठी एका अत्याधुनिक ‘कंट्रोल रुम’सोबतच प्रत्येक पोलीस ठाण्यात छोटी ‘कंट्रोल रुम’ असयाला हवी. यामुळे कॅमेऱ्यांचे फायदे दिसून येतील.

Web Title: The city needs a 'third eye'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.