चव्हाण सर्वात लाचार मुख्यमंत्री - खडसे
By Admin | Updated: June 1, 2014 16:03 IST2014-06-01T15:37:51+5:302014-06-01T16:03:29+5:30
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कोणीच ऐकत नसून चव्हाण हे आजवरचे सर्वात लाचार व हतबल मुख्यमंत्री आहेत अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.

चव्हाण सर्वात लाचार मुख्यमंत्री - खडसे
ऑनलाइन टीम
मुंबई, दि. १ - सत्ताधारी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे एकमेकांशी जमत नाही. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे कोणीच ऐकत नसून चव्हाण हे आजवरचे सर्वात लाचार व हतबल मुख्यमंत्री आहेत अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे यांनी केली आहे.
उद्यापासून राज्यात पावसाळी अधिवेशन होत असून विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन आहे. सत्ताधारी आघाडी सरकारची कोंडी करण्यासाठी विरोधक सरसावले आहे. रविवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. विरोधकांनी नेहमी प्रमाणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यानंतर भाजप नेते एकनाथ खडसे, विनोद तावडे, शिवसेना नेते सुभाष देसाई आणि मनसेचे बाळा नांदगावकर यांनी एकत्रित पत्रकार परिषद घेत सरकारवर टीका केली. सरकारला दलित महिलांवर होणा-या अत्याचाराशी घेणदेणे नाही, राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला जात आहे असा आरोप एकनाथ खडसे यांनी केला. राज्यात महायुतीला मतदान केल्याने काँग्रेस- राष्ट्रवादीचे कार्यकर्ते ग्रामीण भागातील जनतेला धमकावत असून त्यांना वीज तोडण्याची धमकीही दिली जात आहे असा गंभीर आरोप खडसेंनी केला. यंदाच्या अधिवेशनात सिंचन घोटाळ्याचा अहवाल पटलावर यावा यासाठी पाठपुरावा करु असे खडसेंनी सांगितले.
राज्य सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अजित पवारांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विनोद तावडेंनी केली.मुख्यमंत्री स्वच्छ असल्याचा दिखावा करत असून ते भ्रष्टांची पाठराखणच करत आहेत. आदर्शमधील अधिका-यांनी त्यांनी सेवेत का घेतले असा सवालही तावडेंनी उपस्थित केला. गारपीट ग्रस्त शेतक-यांना अपुरी मदत केल्यावरही तावडेंनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली. राज्य सरकार कंत्राटदारांच्या बाजूला झुकली असून या सरकारने मोदींकडून काही तरी शिकायला पाहिजे असा टोलाही तावडेंनी लगावला.
तर अजित पवार, आर.आर. पाटील व मुख्यमंत्री हे तिघे सरकारमधील खलनायक असून पराभवानंतरही आघाडी सरकारचे नेते सुधरायला तयार नाही. अजित पवार म्हणजे महाराष्ट्रावरचा कलंक आहे अशी घणाघाती टीका शिवसेना नेते सुभाष देसाई यांनी केली. या संपूर्ण पत्रकार परिषदेत विरोधी पक्षाचे नेते राज्य सरकारवर निर्लज्ज, लाचार, कलंक अशा बोच-या शब्दात टीका करत असल्याने यंदाच्या अधिवेशनात विरोधक सरकारला चांगलेच धारेवर धरतील असे दिसते.