चासकमानचे आवर्तन मिळणाऱ़़!
By Admin | Updated: July 20, 2016 01:02 IST2016-07-20T01:02:08+5:302016-07-20T01:02:08+5:30
चासकमान धरणातून डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे २३ जुलै रोजी पाणी सोडण्याचा निर्णय आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झाला.

चासकमानचे आवर्तन मिळणाऱ़़!
शिरूर : खरीप हंगामासाठी चासकमान धरणातून डाव्या व उजव्या कालव्यांद्वारे २३ जुलै रोजी पाणी सोडण्याचा निर्णय आज पालकमंत्री गिरीश बापट यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आमदार बाबूराव पाचर्णे यांनी दिली.
चासकमान धरणात ४.३३, तर कळमोडी धरणात १.५१ टीएमसी इतका उपयुक्त पाणीसाठा आहे. अनुक्रमे ५७.२२ व १०० टक्के असे मिळून दोन्ही धरणांत एकूण ६४ टक्के पाणी उपलब्ध आहे. खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पाणी उपलब्ध व्हावे, या उद्देशातून आज मुंबई येथे पालकमंत्री बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. आमदार दिलीप वळसे-पाटील, सुरेश गोरे, बाबूराव पाचर्णे, संग्राम थोपटे, माजी आमदार अशोक पवार, कृष्णा खोऱ्याचे कार्यकारी संचालक आर. बी. घोटे, मुख्य अभियंता टी. एम. मुंडे, अधीक्षक अभियंता अतुल कपोले, कार्यकारी अभियंता पी. बी. शेलार आदी या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत खरीप हंगामासाठी चासकमानच्या डाव्या व उजव्या कालव्यांतून २३ जुलै रोजी पाणी सोडण्याचा निर्णय घेतल्याचे पाचर्णे यांनी सांगितले. ४५ दिवसांचे हे आवर्तन असून, टेल टू हेड या पद्धतीने पाणी सोडले जाईल.(वार्ताहर)