रुपांशू गणवीरचा यशाचा चौकार

By Admin | Updated: June 20, 2014 01:09 IST2014-06-20T01:09:01+5:302014-06-20T01:09:01+5:30

स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे तर योग्य मार्गदर्शनाची देखील तितकीच आवश्यकता असते. मार्गदर्शनाला योग्य प्रेरणा आणि प्रयत्नांची जोड मिळाली

Chance of success of Rupeshu Ganavir | रुपांशू गणवीरचा यशाचा चौकार

रुपांशू गणवीरचा यशाचा चौकार

बहिणीच्या मार्गदर्शनातून सापडली ‘आयआयटी’ची ‘किल्ली’
नागपूर : स्पर्धेच्या युगात आव्हानांना सामोरे जाण्यासाठी केवळ अभ्यासच नव्हे तर योग्य मार्गदर्शनाची देखील तितकीच आवश्यकता असते. मार्गदर्शनाला योग्य प्रेरणा आणि प्रयत्नांची जोड मिळाली तर शिखराला गवसणी सहज घालता येते. हीच बाब ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये मागासवर्गीयांमधून प्रथम येऊन देशात नागपूरचे नाव उंचावणाऱ्या व शिवाजी सायन्सचा विद्यार्थी असलेल्या रुपांशू गणवीरच्या संदर्भात सत्यात उतरली आहे. अगदी शालेय जीवनापासून ते आता ‘आयआयटी’च्या प्रवेश वाटेपर्यंत त्याला थोरली बहीण सुरभी हिने सातत्याने प्रोत्साहन दिले. विशेष म्हणजे सुरभी हिने नुकतेच ‘आयआयटी-हैदराबाद’ येथून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
रुपांशू गणवीर याने ‘जेईई-मेन्स’या परीक्षेत उपराजधानीतून प्रथम स्थान पटकाविले होते अन् आता ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये देशपातळीवर २४ वा क्रमांक मिळवून त्याने ‘डबल’ यश मिळविले आहे. त्याच्या यशात सर्वात जास्त वाटा आहे तो त्याचा थोरल्या बहिणीचा. ‘आयआयटी’त प्रवेश मिळविण्यासाठी कशाप्रकारे अन् किती खोलात जाऊन अभ्यास करावा लागतो याची जाणीव तिने रुपांशूला आठव्या वर्गातच करून दिली होती. ती स्वत: हैदराबादमध्ये शिक्षणाला असली तरी सातत्याने ती फोन व इंटरनेटच्या माध्यमातून रुपांशूला मार्गदर्शन करीत होती. अभ्यास करणे तर रुपांशूच्या हातातच होते, परंतु त्याला प्रोत्साहन देण्याचे महत्त्वाचे काम सुरभीने केले. ‘जेईई-मेन्स’चा निकाल लागल्यानंतर सुरभी रुपांशूसोबत सातत्याने होती. गुरुवारी निकाल लागल्यानंतर रुपांशूला सर्वात पहिला पेढा सुरभीनेच भरविला. माझ्या वेळेस मला मार्गदर्शन करणारे कुणी नव्हते. परंतु रुपांशूच्या बौद्धिक क्षमतेवर आम्हाला विश्वास होता. मी केवळ त्याला प्रोत्साहन दिले, असे मत सुरभी गणवीर हिने व्यक्त केले. रुपांशूचे वडील सूरज गणवीर हे अमरावती येथे ‘एमएसईडीसीएल’मध्ये अभियंता पदावर कार्यरत आहेत तर त्याची आई गृहिणी आहे.
रुपांशूने ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’मध्ये यश मिळविले असले तरी ‘आयआयटी’च्या अगोदरच देशातील नामवंत संस्थांमध्ये त्याचा प्रवेश निश्चित झाला होता. अकरावीत असतानाच ‘आयआयएससी-बेंगळुरू’ (इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स) येथे प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘केव्हीपीआय’च्या (किशोर वैज्ञानिक प्रोत्साहन योजना) परीक्षेत त्याने देशपातळीवर ३२ वा क्रमांक पटकाविला होता. ‘बिट्स-पिलानी’ येथे प्रवेशासाठी आवश्यक असलेल्या परीक्षेतदेखील त्याने ४५० पैकी ४२७ गुण मिळविले. बारावीच्या परीक्षेत त्याला ९५.२ टक्के गुण मिळाले. आता ‘जेईई-अ‍ॅडव्हान्स’च्या रूपात त्याने यशाचा चौकार मारला आहे.
‘आयआयटी-पवई’ हेच लक्ष्य
सुरुवातीपासून माझे लक्ष्य ‘आयआयटी-पवई’ हेच होते. दहावीनंतर लगेच तयारीला लागलो होतो. नियमित सराव व मुद्देसूद अभ्यास यातून पेपर सोडविणे सोपे गेले. माझ्या ताईने मला सातत्याने प्रोत्साहन दिले. याशिवाय माझ्या आई-वडिलांनीदेखील माझ्यावर विश्वास टाकला. दोन वर्षे सातत्याने ‘अभ्यास एके अभ्यास’च सुरू होते व आता मेहनत फळाला आल्याचे समाधान आहे असे मत रुपांशूने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ‘आयआयटीत’ संगणक विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन पदवी मिळाल्यानंतर गणित विषयात संशोधन करण्याचा रुपांशूचा मानस आहे. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे त्याचे आदर्श असून त्यांच्याशी भेट घेण्याची संधीदेखील त्याला शालेय जीवनात मिळाली होती. विशेष म्हणजे रुपांशू मागासवर्गीयांमधून देशात प्रथम आला असला तरी ‘आयआयटी-पवई’ येथे तो खुल्या प्रवर्गातूनच प्रवेश घेणार आहे. रुपांशू याने आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र आॅलिम्पियाडमध्ये भारतातून पाचवे स्थान पटकाविले होते. त्याची थोरली बहीण ‘आयआयटी’तूनच अभियांत्रिकी पदवीचे शिक्षण घेत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Chance of success of Rupeshu Ganavir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.