मध्य रेल्वेचे वाजले तीनतेरा
By Admin | Updated: May 2, 2015 10:21 IST2015-05-02T01:24:16+5:302015-05-02T10:21:59+5:30
अपमार्गे कल्याणच्या दिशेने येणाऱ्या एका मालगाडीचे इंजीन बदलापूर-अंबरनाथ स्थानकांदरम्यान फेल झाल्याची घटना शुक्रवारी घडली

मध्य रेल्वेचे वाजले तीनतेरा
डोंबिवली/अंबरनाथ : अपमार्गे कल्याणच्या दिशेने येणाऱ्या एका मालगाडीचे इंजीन बदलापूर-अंबरनाथ स्थानकांदरम्यान फेल झाल्याची घटना शुक्रवारी घडली. त्यामुळे मध्य रेल्वेची कर्जत-कल्याण मार्गावरील वाहतूक तीन तास ठप्प झाली होती. या घटनेपाठोपाठ घाटकोपर स्थानकादरम्यान ओएचई ओव्हरहेड वायर) वर झाडाची फांदी पडल्यानेही तांत्रिक खोळंबा झाला होता. या दोन्ही घटनांमुळे लाखो प्रवाशांचे सुटीच्या दिवशी प्रचंड हाल झाले.
मालगाडीची घटना सकाळी ११ च्या सुमारास घडली, तर घाटकोपरची घटना दुपारी घडली. मालगाडीचे फेल इंजीन काढण्यासाठी कल्याण येथून इंजिनाच्या साहाय्याने आटोकाट प्रयत्न रेल्वे प्रशासनाने केले, परंतु तरीही ते निघाले नाही. त्यामुळे अपची वाहतूक ठप्प तर डाऊनमार्गे येणारी वाहतूक नियमित वेळेने सुरू होती. सकाळच्या वेळेत झालेल्या या घटनेमुळे कल्याण ते कर्जत मार्गावरील हजारो प्रवासी स्थानकांमध्ये अडकून पडल्याचेही ते म्हणाले. ११ च्या सुमारास झालेल्या बिघाडावर दुपारी १ पर्यंत तोडगा न निघाल्याने रेल्वे प्रशासनाच्या तोंडचे पाणी पळाले होते. एकीकडे गर्दीवर नियंत्रण तर दुसरीकडे समस्येवर तोडगा काढत वाहतूक पूर्वपदावर आणणे, अशा दुहेरी पेचात रेल्वे अधिकारी सापडलेल्याचे होते. अखेरीस दुपारी १.२० च्या सुमारास अडकलेल्या मालगाडीच्या इंजिनाला दुसऱ्या एका इंजिनाच्या साहाय्याने पुढे खेचण्यात यश आल्याने ही कोंडी कशीबशी सुटली आणि हळूहळू वाहतूक पूर्वपदावर आली. संध्याकाळी उशिरापर्यंत प्रवाशांना त्रास झाला.
घाटकोपर स्थानका दरम्यान ओएचईवर झाडाची फांदी पडण्याच्या घटनेमुळेही म.रे. खोळंबली होती. त्याचा फटकाही प्रवाशांना बसला. दिवसभरातील या दोन्ही खोळंब्यामुळे प्रवाशांना मन:स्ताप झाला.रविवारचा मेगाब्लॉक रद्द करावा, अशी मागणीही प्रशासनाकडे केल्याचे देशमुख म्हणाले. हा घोळ सुरू असतांनाही रेल्वेने तिकीट वितरण सुरूच ठेवल्याने प्रवाशांमध्ये संतापाचे वातावरण पसरले होते. त्यामुळे बदलापूरमध्ये त्यांनी एकच गोंधळ करत बुकिंग कार्यालयातील कर्मचाऱ्यांना याचा जाब विचारला. स्थानिक प्रवासी संघटनेसह अन्य संघटनांच्या कार्यकर्त्यांनी यावर तोडगा काढल्यानंतर काही प्रवाशांना तिकिटाच्या पैशांचा परतावा (रिफंड) करण्यात आल्याचेही देशमुख म्हणाले.