केंद्रातूनच चालतो महाराष्ट्राचा कारभार!
By Admin | Updated: March 2, 2015 01:51 IST2015-03-02T01:51:37+5:302015-03-02T01:51:37+5:30
राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोणता, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील दोन्ही पक्ष आपसातील भांडणातच

केंद्रातूनच चालतो महाराष्ट्राचा कारभार!
नाशिक : राज्यात सत्ताधारी कोण आणि विरोधी पक्ष कोणता, अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे. सरकारमधील दोन्ही पक्ष आपसातील भांडणातच गुरफटल्याने त्यांना जनतेच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यास वेळ नाही. दुसरीकडे केंद्राचा राज्यावर दबाव असल्याने विकास भरकटल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला.
महाराष्ट्र नवनिर्माण वीज कामगार सेनेच्या अधिवेशनात ठाकरे यांनी केंद्र व राज्य सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांचा राज्यावर अंकुश आहे. मोदी म्हणतील तसे मुख्यमंत्री फडणवीस वागत असल्याने पूर्वीचे काँग्रेस आणि आताच्या भाजपा सरकारमध्ये कोणताच फरक नसल्याचे ते म्हणाले.
राज्याच्या विकासाबाबत केंद्र आणि राज्य शासनाकडे कोणताही कार्यक्रम नाही. याचकरिता आम्ही सरकारला ब्लू प्रिंट दिली होती.
नाशिक महापालिकेत आम्हाला राष्ट्रवादीने पाठिंबा दिला तर चर्चा होते. तिकडे मोदी पवारांचे गोडवे गातात, त्यांना कुणी जाब विचारत नाही. चार महिन्यांपूर्वी काका-पुतण्यांपासून महाराष्ट्राला वाचविण्याची भाषा करणारे मोदी आता पवारांना आपला राजकीय सल्लागार म्हणतात. आता हे कसे चालते? लालू-मुलायमच्या सोबत मोदी कार्यक्रमाला हजेरी लावतात तेव्हा त्यांना कुणी जाब विचारत नाही, असेही ते म्हणाले.दिल्लीत भाजपाचा पराभव झाला, केजरीवाल यांनी ‘काडकन’ वाजविली. मग पक्ष संपला म्हणून आमच्याविषयीच का चर्चा होते, असा सवाल त्यांनी केला. (प्रतिनिधी)