दाऊद-खडसे ‘कॉल्स’चे प्रकरण हायकोर्टात
By Admin | Updated: May 30, 2016 03:32 IST2016-05-30T03:31:10+5:302016-05-30T03:32:59+5:30
महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित फोन कॉलचा विषय आता उच्च न्यायालयात पोहोचला

दाऊद-खडसे ‘कॉल्स’चे प्रकरण हायकोर्टात
मुंबई : राज्याच्या राजकारणात सध्या चर्चेचा विषय ठरलेला महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि कुख्यात गुन्हेगार दाऊद इब्राहिम यांच्यातील कथित फोन कॉलचा विषय आता उच्च न्यायालयात पोहोचला आहे. या प्रकरणाची केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) जलदगतीने चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका हे प्रकरण उघडकीस आणणारा बडोद्याचा ‘हॅकर’ मनीष भंगाळे याने उच्च न्यायालयात केली आहे.
राजकीय दबावामुळे स्थानिक व मुंबई पोलिसांकडून या प्रकरणाचा नि:पक्ष तपास होण्याची शक्यता नसल्याने खडसे-दाऊद कॉलप्रकरणी जनहित याचिका दाखल केली असून, आपल्या जिवाला धोका असल्याने संरक्षण पुरविण्याची मागणीही भंगाळेने केली आहे. याचिकेवरील सुनावणीची तारीख न्यायालयाकडून सोमवारी निश्चित केली जाणार आहे. दाऊदची पत्नी मेहजबीन शेख हिच्या नावे असलेल्या कराचीतील दूरध्वनीवरून महसूलमंत्री खडसे यांच्या मोबाइलवर कॉल करण्यात आले होते, असा आरोप बडोद्याचा तरुण मनीष भंगाळे व आम आदमी पार्टीच्या प्रवक्त्या प्रीती मेनन यांनी आठवडाभरापूर्वी पत्रकार परिषद घेऊन केला होता. त्यासाठी मनीषने पाकिस्तान टेलिकॉम कंपनी व विविध मोबाइल कंपनीकडून मिळवलेली कागदपत्रे सादर केली होती. खडसे व भाजपाने या आरोपांचा इन्कार केला असला तरी या आरोपांमुळे राजकारण तापले आहे. मुंबई पोलिसांनी सुरुवातीला काही तासांत खडसेंना या प्रकरणी ‘क्लीन चिट’ दिली होती. मात्र नंतर याबाबत पुन्हा सविस्तर चौकशी करण्यात येत असल्याचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांनी स्पष्ट केले होते. दरम्यानच्या काळात हॅकर मनीष भंगाळेची मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मात्र, अधिकाऱ्यांचा दृष्टिकोन योग्य नव्हता, असे भंगाळे याचे म्हणणे आहे.
>भंगाळेचा युक्तिवाद
खडसे - दाऊद संभाषणाबाबत सर्व कॉल डिटेल्स, पुरावे देऊनही पोलिसांकडून अद्याप ‘एफआयआर’ नाही
पुरावे नष्ट व्हावेत म्हणून काही व्यक्तींकडून आपले
ई मेल व अन्य डाटा नष्ट करण्याचा प्रयत्न
जळगावचे पोलीसप्रमुख जालिंदर सुपेकर यांनी आपला जबाब किंवा पुरावे न घेता संबंधित मोबाइल कंपनीकडून मंत्र्यांबाबत ‘क्लीन चिट’ प्रमाणपत्र घेतले
देशहितासाठी आपण हे प्रकरण उघडकीस आणले; मात्र पोलीस, गुप्तचर यंत्रणेकडून राजकीय दबावामुळे दुर्लक्ष
>स्वत:च्या जिवाला धोका असल्याने मनीष भंगाळेने पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे.