२८ हजार जलसेवक राबवणार मोहीम
By Admin | Updated: July 13, 2016 03:56 IST2016-07-13T03:56:35+5:302016-07-13T03:56:35+5:30
वन दिनानिमित्त वृक्षारोपणाच्या यशस्वी मोहिमेनंतर आता राज्यभर जलसाक्षरतेसाठी खास अभियान चालविण्यात येणार आहे.

२८ हजार जलसेवक राबवणार मोहीम
मुंबई : वन दिनानिमित्त वृक्षारोपणाच्या यशस्वी मोहिमेनंतर आता राज्यभर जलसाक्षरतेसाठी खास अभियान चालविण्यात येणार आहे. जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल २८ हजार जलसेवकांची टीम पाण्याविषयी जनजागृती करणार असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. याशिवाय राज्यात विभागीय जलसाक्षरता केंद्रदेखील सुरू करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अलीकडेच जलतज्ज्ञ राजेंद्र सिंह यांच्या उपस्थितीत एक बैठक झाली. यात जलसाक्षरता मोहीम आणि जलसाक्षरता केंद्रांच्या उभारणीबाबत चर्चा झाली. अलीकडच्या काळात पाण्याची भीषण टंचाई राज्याने अनुभवली आहे. विशेषत: मराठवाड्यासारख्या भागात पिण्याच्या पाण्याचीही मोठी समस्या होती. त्यामुळे शास्त्रीय पद्धतीने पाण्याचा वापर, काटकसर होणे आवश्यक आहे. त्यासाठी जनजागृती आणि प्रबोधन आवश्यक आहे. त्यासाठी जलसाक्षरता मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेसाठी राज्यभरातून एकूण ४ हजार ६२४ जलनायक नेमण्यात येणार आहेत. राज्यस्तरावर २४, विभागीय स्तरावर ४८, जिल्हास्तरावर ३४० आणि तालुकास्तरावर ४२१२ जलनायक असतील, तर ग्रामसभेच्या माध्यमातून २८ हजार जलसेवक या मोहिमेची धुरा सांभाळतील, असे मुनगंटीवार म्हणाले.
सर्व जलसेवक विनामोबदला या मोहिमेत सहभागी होणार आहेत. शेकडो जणांनी जलसेवक होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. (प्रतिनिधी)