बीटी कपाशीच्या पेरणीचे दिवस गेले!
By Admin | Updated: July 11, 2014 00:32 IST2014-07-11T00:32:50+5:302014-07-11T00:32:50+5:30
आता मूग, उडीद, मटकी आणि चवळीसोबतच बीटी कपाशीचे खरिपातील नगदी पीक शेतकर्यांच्या हातून गेले आहे.

बीटी कपाशीच्या पेरणीचे दिवस गेले!
अकोला: जुलैचा पंधरवडा आला तरी पावसाचा थांगपत्ता नसल्याने आता मूग, उडीद, मटकी आणि चवळीसोबतच बीटी कपाशीचे खरिपातील नगदी पीक शेतकर्यांच्या हातून गेले आहे. १५ जुलैपर्यंंत पाऊस येईल, अशी कृषी शास्त्रज्ञांना अपेक्षा आहे. असे असले तरी, अनेक शेतकर्यांनी आता अर्धरब्बी पिकांचे नियोजन करणे सुरू केले आहे. साधारणत: जूनचा शेवटचा आठवडा किंवा जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पाऊस येतो. ते गृहित धरून शेतकर्यांनी जुलैच्या पहिल्या आठवड्यात पेरण्या केल्या; तथापि गत दहा वर्षांंत कधी नव्हे एवढा पावसाला विलंब झाला. विदर्भातील शेतकर्यांनी महागडे बी-बियाणे खरेदी केले असून, या शेतकर्यांना पावसाची प्रतीक्षा आहे; परंतु पावसाचा थांगपत्ता नसल्याने सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. या परिस्थितीचा विचार करता, अनेक शेतकर्यांनी आता कापूस, सोयाबीन, बाजरी, ज्वारीचे बियाणे पुढील वर्षी पेरण्याचा निर्णय घेतला असून, त्याजागी अर्धरब्बी म्हणजेच तीळ, सुर्यफूल, करडई व तूर या पिकांचे नियोजन करणे सुरू केले आहे. दरम्यान, बीटी व संकरित कापूस, सोयाबीन या खरिपातील पिकांच्या पेरणीचा सामान्य कालावधी निघून गेला आहे. आता १५ जुलैपर्यंंत पाऊस आल्यास कापूस पेरणी करणार्या शेतकर्यांना काळजी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी खोल व मध्यम खोल, काळी जमीनच कपाशीसाठी उपयुक्त ठरणार आहे. शेतकर्यांना बियाणे पेरणीतील अंतर कमी करावे लागणार आहे. लवकर परिपक्व होणारे अमेरिकन अथवा देशी कापसाचा वापर केल्यास त्याचा फायदा होण्याची शक्यता आहे. सलग सोयाबीन पिकासाठी कृषि विद्यापिठांच्या शिफारशीप्रमाणे लागवड तंत्रज्ञानाचा अवलंब करणे आवश्यक आहे. यावर्षी सोयाबीन अधिक तूर असे आंतरपीक लावल्यास त्याचा शेतकर्यांना फायदा होईल. धान रोवणी करणार्या शेतकर्यांना शिफारशीप्रमाणे रोवणी करावी लागणार असून, साकोली-६, पिकेव्ही मकरंद, पिकेव्ही गणेश, पिकेव्ही एचएमटी, सिंदेवाही २00१ या वाणांची निवड केल्यास फायदेशीर ठरणार आहे.