मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे

By Admin | Updated: October 20, 2016 06:00 IST2016-10-20T06:00:19+5:302016-10-20T06:00:19+5:30

राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी

Bring death to zero | मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे

मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे


मुंबई : राज्यातील आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी तज्ज्ञांच्या समितीने सुचविलेल्या उपाययोजनांची संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी बुधवारी दिले.
आदिवासी आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यू रोखण्यासाठी, आवश्यक उपाययोजना सुचविण्यासाठी नेमण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीची बैठक राजभवन येथे झाली. या वेळी आदिवासी विकासमंत्री विष्णू सवरा, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. तज्ज्ञांच्या समितीने आपला अहवाल राज्यपालांना सादर केला. या वेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, ‘आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांचे मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी समन्वयातून प्रयत्न करायला हवेत, तसेच आश्रमशाळांमध्ये आरोग्य सुविधा आणि सकस आहार विशेष उपलब्ध करून द्यावा. विद्यार्थ्यांसाठी दिल्या जाणाऱ्या दोन जेवणांमध्ये जास्त कालावधी ठेवू नये.’
राज्यातील आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या प्रमाणात वाढ होत असल्याने, त्याची कारणमीमांसा आणि उपाययोजना करण्यासाठी, ३० मे २०१६ रोजी डॉ. सुभाष साळुंके यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य, कुपोषण निर्मूलन आणि आदिवासी क्षेत्रात कार्य करणाऱ्या तज्ज्ञांची समिती नेमण्यात आली होती. या समितीने राज्यातील १९ आश्रमशाळांना भेटी देत, विद्यार्थ्यांच्या मृत्यूच्या कारणांचा अभ्यास केला. दहा वर्षांत १,०७७ विद्यार्थ्यांच्या मृत्यू झाला असून, त्यात सर्पदंश, पोटदुखी, ताप, अपघात, आत्महत्या आदी कारणांचा समावेश असल्याचा समितीने निष्कर्ष काढला. यासोबतच आश्रमशाळेत विद्यार्थ्यांसाठी असलेल्या सोईसुविधांची पाहणी करत, त्यामध्ये सुधारणा करण्याची शिफारस केली आहे. सकस आहार आणि राहण्याची उत्तम व्यवस्था करण्याची, तसेच विद्यार्थ्यांच्या दोन जेवणांमध्ये दीर्घ कालावधी असता कामा नये, अशा सूचनाही समिती सदस्यांनी केल्या आहेत. परिसरातल्या चार ते पाच आश्रमशाळांसाठी १०८ क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून द्यावी. ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल आहेत, तिथे वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन, विद्यार्थिनींशी चर्चा करावी. सुचविलेल्या उपाययोजनांची तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन समितीने या संदर्भातील अभ्यास करावा. यासाठी समितीला मुदतवाढ देण्याचे निर्देश राज्यपालांनी दिले. (प्रतिनिधी)
>समिती सदस्यांच्या सूचना
परिसरातल्या चार ते पाच आश्रमशाळांसाठी १०८ क्रमांकाची आपत्कालीन वैद्यकीय सुविधा पुरविणारी रुग्णवाहिकेची सोय उपलब्ध करून द्यावी.
ज्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराच्या तक्रारी दाखल आहेत, तिथे वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्यांनी भेटी देऊन, विद्यार्थिनींशी चर्चा करावी. यामुळे विद्यार्थिनींमध्ये विश्वास निर्माण होऊन, घटनेबाबत त्या महिला अधिकाऱ्यांशी मनमोकळेपणाने बोलू शकतील.
उपाययोजना सुचविल्या आहेत, त्यावर संबंधित विभागांनी तत्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश देऊन समितीने भविष्यातही या संदर्भातील अभ्यास करावा. यासाठी समितीला मुदतवाढ देण्याचे निर्देश राज्यपालांनी या वेळी दिले.

Web Title: Bring death to zero

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.