पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या वावर वांगणी येथील लेंडी नदीवरील पूल कमकुवत झाला असून या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्याचे आदेश मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आले आहेत.
जव्हार-सारसून रस्त्यावरील लेंडी नदीवरील ९.५० मीटरचा व ५ गाळ्यांच्या पुलाचे बांधकाम १९९२ साली झाले होते. दोन वर्षापूर्वी या पुलाची डागडुजी करण्यात आली होती, मात्र जुलै २०२३ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे या पुलावरून पाणी जाऊन पूल पूर्णपणे बुडाला होता.
या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट हे २९ एप्रिल २०२४ मध्ये करण्यात आले होते, त्यात हा पूल कमकुवत झाल्याचे स्पष्ट झाले. यावर्षी या पुलाची दुरुस्ती तथा नवीन बांधकाम न झाल्याने पुलावरून अवजड वाहतूक १८ जूनपासून ते १७जुलैपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जव्हार बाजूकडून पुढे जाण्याकरिता चालतवग्रमार्गे सायवन-ओझर या मार्गाने व जव्हार बाजूकडे येताना वावर वांगणी माळधर-खंडीपाडा या मार्गाने प्रवास करता येणार आहे.
भातसा नदीवरील पूल डळमळीतशहापूर-किन्हवली-मुरबाड रस्त्यावरील सापगावजवळील भातसा नदीवरील पूल धोकादायक स्थितीत आहे. वारंवार डांबरीकरण आणि काँक्रिटीकरण करून या पुलाचा खालचा भाग कोसळला असून, काही भाग खचला आहे. या पुलावरून कर्जत, मुरबाड, अहमदनगर, जेएनपीए येथून येणान्या अवजड वाहनांची वर्दळ सुरू असते. नवीन पूल बांधण्याची मागणी गेल्या पाच वर्षांपासून नागरिक करीत आहेत. निविदा प्रक्रिया झाली आहे; परंतु काम रखडले आहे. भातसा धरणातून पाण्याचा विसर्ग होतो तेव्हा हा पूल पाण्याखाली जातो. नवीन पूल मंजूर आहे; पण कामाला अद्याप सुरुवात झालेली नाही. प्रशासन पूल कोसळण्याची वाट बघत आहे का, असा सवाल माजी बांधकाम आणि आरोग्य सभापती वंदना भांडे यांनी केला.
नांदगाव पूल कमकुवतसार्वजनिक बांधकाम विभागाने धोकादायक घोषित केलेले हे पूल वास्तविक पाहता तोडणे गरजेचे असताना नऊ वर्षे है पूल सुरूच आहेत. पनवेल तालुक्यात नावडे, नांदगाव हे पूलदेखील थोकादायक स्थितीत आहेत. पावसाळ्यात नदी दुतर्फा वाहू लागताच या पुलापर्यंत पाणी येते. काही वेळेला अतिवृष्टीत नांदगाव पूल पाण्याखाली जातो. अशावेळेला या पुलावरून वाहतूक करणारी वाहने पाण्यात वाहून जाण्याची भीती आहे. कोकणाचा भाग असल्याने पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होत असते. अशावेळी अपघाताची भीती अधिक असल्याने प्रशासनाने पावसाळ्याच्या तोंडावर सतर्कता बाळगावी, अशी मागणी होत आहे.