व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी वाया
By Admin | Updated: April 13, 2017 20:05 IST2017-04-13T20:05:18+5:302017-04-13T20:05:18+5:30
साता-यासह सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करणा-या टेंभू जलसिंचन योजनेच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह गुरुवारी फुटला.

व्हॉल्व्ह फुटून लाखो लिटर पाणी वाया
>आॅनलाईन लोकमत
क-हाड (सातारा), दि. 13 - साता-यासह सांगली व सोलापूर जिल्ह्यांतील दुष्काळी भागाला पाणीपुरवठा करणा-या टेंभू जलसिंचन योजनेच्या पाईपलाईनचा व्हॉल्व्ह गुरुवारी फुटला. दिवसभरात या व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत लाखो लिटर पाणी वाया गेले. व्हॉल्व्ह फुटल्याने तीस ते पस्तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडताना दिसत होते.
क-हाडनजीक कृष्णा नदीवर टेंभू प्रकल्प असून, या प्रकल्पातून सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यांत पाणीपुरवठा केला जातो. शेती ओलिताखाली आणण्यासाठी या प्रकल्पाची उभारणी करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून तिन्ही जिल्ह्यांतील सुमारे ७९ हजार हेक्टर क्षेत्राला पाणीपुरवठा करण्यात आला आहे. दुष्काळी पट्ट्याला हा प्रकल्प वरदान ठरत आहे. दुष्काळी भागाला पाणी पुरविण्यासाठी या प्रकल्पाच्या माध्यमातून रात्रंदिवस पाणी उपसा करण्यात येत आहे. अशातच बुधवारी रात्री अचानक टेंभू गावच्या हद्दीतील रेल्वे लाईनजवळ पाईपलाईनचा एक व्हॉल्व्ह नादुरुस्त होऊन फुटला. त्यामुळे रात्रभर परिसरात पाण्याचे लोट वाहत होते. फुटलेल्या व्हॉल्व्हमधून तीस ते पस्तीस फुटांपर्यंत पाण्याचे फवारे उडत होते. व्हॉल्व्ह फुटला त्यावेळी मोठा आवाज झाला. सुरुवातीला हा आवाज कशाचा आहे, हेच न समजल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले. मात्र, व्हॉल्व्ह फुटल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.
दरम्यान, नागरिकांनी याबाबतची माहिती टेंभू प्रकल्पाला देऊनही गुरुवारी दिवसभरात या व्हॉल्व्हची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.