संस्कृत घेतलेल्या विद्यार्थिनीच्या गळ्यात बोर्डाने मारले हिंदी
By Admin | Updated: June 9, 2016 03:49 IST2016-06-09T03:49:29+5:302016-06-09T03:49:29+5:30
नवी मुंबईतील सेंट अगस्टीन शाळेची विद्यार्थिनी अनुजा कैलास अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले
_ns.jpg)
संस्कृत घेतलेल्या विद्यार्थिनीच्या गळ्यात बोर्डाने मारले हिंदी
जितेंद्र कालेकर,
ठाणे- महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या गलथान कारभारामुळे नवी मुंबईतील सेंट अगस्टीन शाळेची विद्यार्थिनी अनुजा कैलास अरगडे हिला चक्क एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या विद्यार्थिनीने संस्कृत विषय घेतला असतानाही ती हिंदी विषयाची विद्यार्थिनी असल्याचे दाखवून ती परीक्षेला अनुपस्थित राहिल्याने अनुत्तीर्ण झाल्याचा जावईशोध बोर्डाने लावला आहे.
अनुजाने आॅनलाइन एसएससीचा निकाल पाहिल्यावर तिला धक्काच बसला. दरवर्षी ९० टक्के गुण मिळवणाऱ्या अनुजाला एसएससीमध्ये एका विषयात अनुपस्थित दाखवून अनुत्तीर्ण करण्यात आले होते. तिला इंग्रजीमध्ये ७५, मराठी ८१, हिंदी- गैरहजर, गणित ९०, सामान्य तंत्रज्ञान ९१ आणि समाजशास्त्र ८६ असे गुण आहेत. मुळात तिने हिंदी विषय घेतलाच नव्हता. ती संपूर्ण १०० गुणांच्या संस्कृत विषयाची विद्यार्थिनी असल्याने तिने त्या विषयाची परीक्षा दिली होती. बोर्डाच्या कार्यालयात चकरा मारल्या असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली. त्यामुळे अनुजा हताश झाली होती.
अखेरीस, प्रस्तुत प्रतिनिधीच्या मदतीने अरगडे कुटुंबीयांनी बुधवारी मंडळाचे सचिव जगताप यांची भेट घेतली असता त्यांच्या लक्षात या प्रकरणाचे गांभीर्य आले. या चुकीमागचे कारण शोधून लवकरच संस्कृत विषयाचे गुणही निकालपत्रात अनुजाला मिळतील, असे त्यांनी आश्वस्त केले.
परीक्षेपूर्वीच अनुजाच्या परीक्षा प्रवेशपत्रावर (रिसीट) विषयांच्या सूचीत संस्कृतऐवजी हिंदी हा विषय दाखवण्यात आला होता. शिक्षण मंडळाची ही चूक दुरुस्त करण्यासाठी सेंट अगस्टीन शाळेने १६ फेब्रुवारी २०१६ रोजीच तातडीने पत्रव्यवहार केला होता. परीक्षेपूर्वी स्वत:ची चूक दुरुस्त करण्याऐवजी रिसीटवर दाखवल्याप्रमाणे तिच्या गुणपत्रिकेतही हिंदी विषयाचाच उल्लेख करून तिला अनुत्तीर्ण करण्याची महाचूक बोर्डाने केली.
‘‘अनुजाला आतापर्यंत ९० टक्के गुण मिळालेले आहेत. एसएससी परीक्षेत इतर विषयांतही तिला चांगले गुण मिळाले असल्याने हा निकाल आमच्यासाठी धक्कादायक आहे. मंडळाकडून आधी उडवाउडवीची उत्तरे मिळाली. पण, आता सचिवांकडून दुरुस्तीचे आश्वासन मिळाले आहे. प्रवेशासाठी असलेली स्पर्धा आणि निर्धारित वेळ याचे महत्त्व ओळखून मंडळाने ही दुरुस्ती तातडीने करावी, एवढीच अपेक्षा आहे.’’
- भारती कैलास अरगडे,
अनुजाची आई, नेरळ