उत्तर मुंबईत भाजपा करणार नेत्रदीपक कामगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2017 02:23 IST2017-01-08T02:23:59+5:302017-01-08T02:23:59+5:30
‘मै सबका, सब मेरे’ या उक्तीप्रमाणे राजकारणात सक्रिय आणि कार्यमग्न असलेले खासदार गोपाळ शेट्टी हे लोकप्रतिनिधी म्हणून येत्या फेब्रुवारीत २५ वर्षे पूर्ण करीत आहेत.

उत्तर मुंबईत भाजपा करणार नेत्रदीपक कामगिरी
- मनोहर कुंभेजकर, मुंबई
‘मै सबका, सब मेरे’ या उक्तीप्रमाणे राजकारणात सक्रिय आणि कार्यमग्न असलेले खासदार गोपाळ शेट्टी हे लोकप्रतिनिधी म्हणून येत्या फेब्रुवारीत २५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त आणि आगामी पालिका निवडणुकीबाबत त्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ अंतर्गत विविध विषयांवर संवाद साधला.
देशात, राज्यात आणि उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात केलेल्या विकासकामांच्या जोरावर आम्ही आगामी निवडणुकीत मतदारांना सामोरे जाणार आहोत. उत्तर मुंबईतून भाजपाचे सध्या ११ नगरसेवक असले तरी सर्व ४२ जागा जिंकण्यासाठीच आम्ही रिंगणात उतरू, असा ठाम विश्वास भाजपाचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला. ‘मै सबका, सब मेरे’ या उक्तीप्रमाणे राजकारणात सक्रिय आणि कार्यमग्न असलेले खासदार गोपाळ शेट्टी हे लोकप्रतिनिधी म्हणून येत्या फेब्रुवारीत २५ वर्षे पूर्ण करीत आहेत. त्यानिमित्त आणि आगामी पालिका निवडणुकीबाबत त्यांनी ‘लोकमत व्यासपीठ’ अंतर्गत विविध विषयांवर संवाद साधला.
आगामी पालिका निवडणुकीत उत्तर मुंबईत भाजपाची रणनीती काय असेल, असे विचारता शेट्टी म्हणाले, आगामी पालिका निवडणूक ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही लढविणार आहोत. गेल्या काळाच्या तुलनेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अनेक वेळा उत्तर मुंबईत आले. मुख्यमंत्री हे भाजपाचे ट्रम्प कार्ड असतील.
पालिका निवडणुकीत भाजपा-सेना युतीबाबत विचारले असता, खासदार शेट्टी म्हणाले की, त्याबाबत आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील. जर युती झाली तर १७५ जागा आम्ही जिंकू; आणि जर युती झाली नाही, तर भाजपा कार्यकर्ते पक्षाच्या आदेशाचे पालन करून उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात सर्व ४२ जागा जिंकण्यासाठी मैदानात उतरतील आणि भाजपाला १२५ जागा मिळवून आम्ही आमचा महापौर विराजमान करू. पालिकेतील घोटाळ्यांवर बोलताना ते म्हणाले, रस्ते घोटाळा, नालेसफाई घोटाळा हे चुकीचे एस्टीमेट सादर करून केलेले घोटाळे आहेत. यात पालिकेतील अधिकारी आणि राजकीय पक्षांचेही संगनमत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदारसंघातील कामांबाबत ते म्हणाले, पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत ११ हजार घरांत विनामूल्य शेगडी व गॅसची जोडणी देण्याचा विक्रम आम्ही केला. वर्सोवा-मढ जेट्टी येथील वेसावे येथे रस्त्याअभावी बोटसेवा बंद पडली होती. केंद्रीय अर्थराज्यमंत्री जयंत सिन्हा यांच्याकडे पाठपुरावा करून प्रसंगी दालनात ठिय्या आंदोलन करून हा प्रश्न सोडवून घेतला. संरक्षण खात्यांतर्गत असलेल्या मालाड पूर्व आणि कांदिवली (पूर्व) येथील अर्धा किमी परिसरातील अनेक इमारतींचा पुनर्विकास साडेतीन वर्षे रखडला होता. याबाबत केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांच्याकडे पाठपुरावा करून ही बंदी उठवून घेतली. आता तेथे पुनर्विकासाचा मार्ग मोकळा झाला आहे. पालघर जिल्ह्यातील गोऱ्हे गाव एक आदर्श गाव म्हणून नावारूपाला आणले आहे. बोरीवलीतील शिंपोली येथे १५ एकर जागेवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल उभारले तर कांदिवलीतील महावीरनगरात १३ एकर जागेवर युवकांना संधी देणारे प्रमोद महाजन क्रीडा संकुल उभारले. महिला सशक्तीकरण, बेटी बचाव बेटी पढाव, स्वच्छ भारत अभियान, सुरक्षा विमा योजना असे अनेक विधायक उपक्रम राबविल्याचेही खा. शेट्टी म्हणाले.
आरे कार शेडमध्ये पर्यावरणाच्या नावाखाली मेट्रो कार शेडला विरोध करणे चुकीचे असल्याचे सांगून मोकळ््या जागांचा वापर करावा, अशी आपली भूमिका असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगितले. झाडे तोडल्यास पुन्हा दुसरीकडे ती लावता येतील. तसेच हजारो झोपड्यांचाही पुनर्विकास करता येईल. मध्य वैतरणा प्रकल्पात १ लाख झाडे तोडली. मात्र या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मुंबईचा पाण्याचा प्रश्न मिटला, अशी आठवणही त्यांनी करून दिली.