भाजपचे तेच, शिवसेनेचे फ्रेश
By Admin | Updated: September 26, 2014 01:22 IST2014-09-26T01:22:29+5:302014-09-26T01:22:29+5:30
युती दुभंगल्यानंतर उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याऐवजी थेट विद्यमान आमदारांना अर्ज भरण्यास भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार आमदार

भाजपचे तेच, शिवसेनेचे फ्रेश
फडणवीस, खोपडे, देशमुख, कुंभारे सज्ज
नागपूर: युती दुभंगल्यानंतर उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्याऐवजी थेट विद्यमान आमदारांना अर्ज भरण्यास भाजपकडून सांगण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह चार आमदार अर्ज दाखल करणार आहेत. उत्तर आणि दक्षिणच्या उमेदवारांचाही निर्णय शुक्रवारीच होणार आहे.भाजपच्या स्थानिक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह शुक्रवारी पूर्व नागपूरसाठी पक्षाचे विद्यमान आमदार कृष्णा खोपडे, पश्चिम नागपूरसाठी विद्यमान आमदार सुधाकर देशमुख, मध्य नागपूरसाठी विकास कुंभारे एकत्रितपणे उमेदवारी अर्ज भरणार आहेत. कामठीमधून भाजपचे विद्यमान आमदार चंद्रशेखर बावनकुळे अर्ज भरणार आहेत.
यावेळी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचा निरोप भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आला आहे. दरम्यान शहरातील उत्तर आणि दक्षिण नागपूरसाठी उमेदवार निश्चित करण्यासाठी शुक्रवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची बैठक होणार असून त्यात नावे निश्चित केली जाणार आहे.
शिवसेनेने त्यांचे उमेदवार निश्चित केले असले तरी ते शनिवारी अर्ज भरण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
गडकरी, फडणवीस देणार राजकीय धक्के
शिवसेनेसोबत असलेली युती तुटल्यानंतर नागपूर शहर आणि जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले असून, भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस पुढील दोन दिवसांत मोठे राजकीय धक्के देणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. शहर आणि जिल्ह्यातील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे काही नेते मागील काही दिवसांपासून गडकरी आणि फडणवीस यांच्या संपर्कात आहेत. परंतु युती तुटण्याची अधिकृत घोषणा न झाल्यामुळे गुरुवारी सायंकाळपर्यंत त्यांचे ‘तळ्यात- मळ्यात’ सुरू होते. संध्याकाळनंतर मात्र या नेत्यांचे संपर्क करणे सुरू झाले. मध्यरात्रीपासून गाठीभेटीदेखील सुरू झाल्या. शुक्रवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा असून किती मोठे भूकंप होतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून आहे.