वरळीत भाजपाची फिल्डिंग
By Admin | Updated: January 21, 2017 02:53 IST2017-01-21T02:53:09+5:302017-01-21T02:53:09+5:30
वरळीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार फिल्डिंग लावली आहे.
_ns.jpg)
वरळीत भाजपाची फिल्डिंग
चेतन ननावरे,
मुंबई- वरळीतील मतदारांना आकर्षित करण्यासाठी भारतीय जनता पार्टीने जोरदार फिल्डिंग लावली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर चार हजारांहून अधिक मतदारांना आधारचे
स्मार्टकार्ड मोफत वितरित करून भाजपाने संपर्काचा नवा फंडा वापरला आहे.
केवळ निवडणुका आहेत, म्हणून हा उपक्रम घेतला नसल्याचे भाजपाचे वडाळा विधानसभा सचिव राजेंद्र (राजन) डेरवणकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्मार्टकार्डसाठी ठिकठिकाणी वेगवेगळे दर आकारले जातात. बहुतांश लोकांना स्मार्टकार्डची माहिती नसून काही ठिकाणी तळागाळातील नागरिकांची आर्थिक लूटही केली जाते. त्यामुळे स्मार्टकार्डची माहिती, उपयोग आणि लाभ मिळवून देण्याची मागणी विभागातील नागरिकांकडून होत होती. त्यामुळे मोफत स्मार्टकार्ड काढून देण्याचा उपक्रम राबवला. आश्चर्याची बाब म्हणजे सुमारे हजार नागरिकांनी या उपक्रमाची मागणी केली होती. मात्र चार हजारांहून अधिक नागरिकांनी याचा फायदा घेतला.
स्मार्टकार्डशिवाय भाजपाने विभागातील तरुण, महिला आणि विद्यार्थ्यांसाठीही वेगवेगळे उपक्रम राबविल्याचा दावा डेरवणकर यांनी केला आहे. त्यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘मन की बात, चाय के साथ’ उपक्रम, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त कापडी पिशव्या वाटप, हुशार व गरजू विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप आणि स्वच्छता अभियान असे विविध उपक्रम वरळीत याआधीही स्वत: राबवले आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे दहीहंडी सणावर सर्वोच्च न्यायालयाने निर्बंध लादल्यानंतर नियमांचे पालन करणाऱ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजन यशस्वीरीत्या करून दाखवले
होते. त्यामुळे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा उपक्रम राबवलेला नाही, तर याआधीही सातत्याने वरळीत उपक्रम राबवल्याचे डेरवणकर यांनी सांगितले.
>पक्षबांधणी महत्त्वाची!
केवळ एक उपक्रम घेऊन मतदारांशी संपर्क साधता येत नाही, असेही डेरवणकर यांनी सांगितले. ते म्हणाले की, गेल्या १७ वर्षांपासून या ठिकाणी पक्षबांधणी करत आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांच्या वेळोवेळी बैठका घेत आहे. शिवाय भाजपा सरकारच्या केंद्र आणि राज्यातील योजना विभागातील नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.
>अन्य पक्षही सरसावले
भाजपाने मतदारांना गाठण्याची लढवलेली शक्कल पाहून अन्य पक्षीय नेत्यांनीही या प्रभागात कामांचा धडाका सुरू केला आहे. यापुढच्या काही दिवसांमध्ये पक्षीय कामांची गती अधिक सुरू राहणार असल्याचे राजकीय निरीक्षकांचे म्हणणे आहे. या प्रभागातील नागरी समस्यांचे मुद्दे करण्यासाठीही पक्षांमध्ये चढाओढ सुरू झालेली आहे.