भाजपाची रणनीती शिवसेनेला खाऊन टाकेल

By Admin | Updated: July 1, 2016 04:05 IST2016-07-01T04:05:51+5:302016-07-01T04:05:51+5:30

गेल्या काही वर्षांत भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांची सहकारी पक्षांबद्दलची भूमिका संशयास्पद झाली आहे.

The BJP strategy will eat Shiv Sena | भाजपाची रणनीती शिवसेनेला खाऊन टाकेल

भाजपाची रणनीती शिवसेनेला खाऊन टाकेल

अतुल कुलकर्णी,

मुंबई- गेल्या काही वर्षांत भाजपाच्या राष्ट्रीय नेत्यांची सहकारी पक्षांबद्दलची भूमिका संशयास्पद झाली आहे. त्यांच्यासोबत जे जे पक्ष जोडले गेले त्यांनाच खाऊन टाकण्याचे, कायमचे संपविण्याचे काम भाजपातर्फे सुरू आहे. महाराष्ट्रातदेखील शिवसेनेसोबत तेच होत आहे. त्यामुळे येत्या काळात शिवसेनेला खाऊन टाकण्याचे काम भाजपातर्फे केले जाईल, अशी भविष्यवाणी जेडीयूचे ज्येष्ठ नेते खा. के.सी. त्यागी यांनी केली आहे.
त्यागी हे औद्योगिक पार्लमेंटरी कमिटीचे अध्यक्ष आहेत. कमिटीच्या बैठकीसाठी ते मुंबईत आले होते. त्या वेळी लोकमतशी बोलताना ते म्हणाले, महाराष्ट्रात भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाताचे बोट पकडून भाजपाला महाराष्ट्रात वाढवले. एक जमाने में, शिवसेना को वो बडा भाई कहते थे... पण आता शिवसेनेला अपमानित करण्याची एकही संधी भाजपा सोडायला तयार नाही. भाजपामध्ये आता ‘प्रतिशोध’ची भावना वाढीला लागली आहे. बदला घेण्याच्या वृत्तीने भाजपाच्या ज्येष्ठ नेत्यांना पछाडलेले आहे, असा आरोपही त्यांनी या मुलाखतीत केला.
कधीकाळी आपणसुद्धा काँग्रेसच्या विरोधात तुरुंगात गेला होतात आणि आता त्याच काँग्रेससोबत तुम्ही बिहारमध्ये हातमिळवणी केली, त्याचे काय?
त्यागी : डॉ. लोहियांचा त्या वेळी असणारा विचार वेगळा होता. तेव्हा कन्याकुमारी ते काश्मीर सगळीकडे काँग्रेस होती. गरिबांप्रति काँग्रेसला तेव्हा कणव नव्हती. सामाजिक न्यायासाठी सत्तेचा वापर करणे डॉ. लोहियांना अपेक्षित होते. त्यामुळे ती वेळवेगळी होती, पण आता काँग्रेससोबत लढण्यात समजूतदारपणा नाही. आताची लढाई लोकशाही वाचविण्याची आहे. काँग्रेसने कभी सांप्रदायिकता के साथ कॉम्प्रमाइज नही किया था... पण आता लव्ह जिहाद, बीफ, लोकसंख्या, इतिहास बदलणे, समान नागरी कायदासारख्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. योग करताना त्यात ओम् आणले जात आहे.
देशात तिसरी आघाडी कशी उभी राहू शकेल?
त्यागी : पंडित नेहरूंचा काळ वेगळा होता. त्यांच्या काळात कधीही कार्यकर्त्यांची उपेक्षा झाली नाही. जनतेशी बांधिलकी मानणाऱ्या नेत्यांना पक्षात स्थान होते, पण नंतर काँग्रेसमध्ये दरबारी राजकारण शिरले. कोणाशी लढायचे आहे, हे काँग्रेसने आधी ठरवायला हवे. त्यांचा शत्रू भाजपा आहे की अन्य विरोधी पक्ष आहेत, याचा निर्णय त्यांनी आधी घ्यायला हवा. त्यानंतर एक ‘आपसी तालमेल’ बनवावा लागेल. नितीशकुमार, लालू, शरद पवार, बिजू पटनायक अशा सगळ्यांना सोबत घ्यावे लागेल. तरच भविष्यात भाजपाशी लढणे सोपे जाईल.
मोदींच्या मेक इन इंडिया, स्टार्ट अप इंडियातून उद्योगात गुंतवणूक वाढेल का?
त्यागी : दिखावे पे मत जाईये भाईसाब... आज छोट्या आणि मध्यम प्रकारच्या उद्योगात ४० लाख रोजगार कमी झाले आहेत. फक्त ५५० बड्या उद्योगांना ४७०० कोटींचे कर्ज दिले गेले आहे. ते कोणत्या आधारावर दिले गेले हे जनतेसमोर आले पाहिजे. उद्योगांची आर्थिक स्थिती चांगली नाही. मागासवर्गीयांना उद्योगासाठी कर्ज देताना पक्षपात केला जात आहे. कोणत्या उद्योगांना कर्ज दिले जावे याची शिफारस करताना सीडबीकडून भेदभाव होतो, त्यांना अपमानित केले जाते, अशा अनेक तक्रारी आल्या आहेत.
मोदी सरकारच्या कामगिरीवर तुमचे मत काय?
त्यागी : सगळ्या योजना बेमतलब आहेत... २५ वर्षांचे नियोजन समोर ठेवून काहीही होताना दिसत नाही. स्टील उद्योग अडचणीत आला आहे. कोट्यवधी छोटे व्यापारी अडचणीत आले आहेत, त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असणारा रोजगार अडचणीत आला आहे. एफडीएच्या बाबतीत तेच झाले. उद्योजक, छोटे व्यापारी यांचे वाईट दिवस यातून सुरू झाले आहेत. अ‍ॅन्टीलेबर लॉ उद्योगांवर लादला जात आहे. कॉर्पोरेट उद्योगांसाठी मात्र झारखंड, छत्तीसगढ, ओडिशा अशा राज्यांतील आदिवासींची जमीन ताब्यात घेतली जात आहे. त्यांच्या मालकीचे जल, जंगल, जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. त्यामुळे तरुण आदिवासी नक्षलवादाकडे वळू लागले आहेत.
तुमच्या मते देश हुकूमशाहीकडे निघालाय?
त्यागी : आज अघोषित आणीबाणीकडे आपण निघालोय. देशात लोकशाही टिकवण्याच्या गप्पा होत आहेत, पण भाजपा पक्षातच लोकशाही राहिलेली नाही. एकही भाजपाचा नेता ठामपणे आपली भूमिका मांडू शकत नाही किंवा काही चुकत असेल तर सांगू शकत नाही.
जे काही चालू आहे ते सगळे
एकच व्यक्ती केंद्रबिंदू मानून
चालू आहे. आज सीबीयआयचा
वापर वाईट पद्धतीने केला जातोय. ईडी, आयटी, सीबीआय यांची
भीती दाखवून लोकांची तोंडे गप्प केली जात आहेत. ही हुकूमशाही नाही तर काय?
बिहारचा विकास झाला तर तेथून बाहेर पडणारे लोंढे थांबतील असे वाटत नाही का?
त्यागी : बिहारला कोणतेही पॅकेज दिले गेलेले नाही. फक्त घोषणा केल्या गेल्या. भाजपा सरकारने निवडणुकीच्या काळात केलेल्या घोषणा काढून पाहा. बिहारी जनतेला घोषणेशिवाय काहीही मिळालेले नाही.

Web Title: The BJP strategy will eat Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.