निवडणुकीमुळे भाजपला शिवछत्रपतींची आठवण - राणे
By Admin | Updated: September 24, 2014 15:31 IST2014-09-24T15:31:05+5:302014-09-24T15:31:05+5:30
आधी निवडणुका आल्यावर भाजपला रामाची आठवण यायची. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने भाजपला शिवछत्रपतींची आठवण येते असा टोला काँग्रेस नेते नारायण राणे यांनी लगावला आहे.

निवडणुकीमुळे भाजपला शिवछत्रपतींची आठवण - राणे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २४ - आधी निवडणुका आल्यावर भाजपला रामाची आठवण यायची. आता विधानसभा निवडणूक तोंडावर आल्याने भाजपला शिवछत्रपतींची आठवण येते असा टोला काँग्रेस नेते नारायण राणे यांनी लगावला आहे. महाराष्ट्र भाजपकडे सक्षम नेता नसल्याने भाजपच्या बॅनरवर मोदींचेच फोटो झळकत आहेत अशी बोचरी टीकाही त्यांनी केली आहे.
काँग्रेस नेते नारायण राणे यांनी बुधवारी पत्रकार परिषद घेऊन केंद्रातील भाजप सरकारवर कडाडून टीका केली. भाजपने मुंबईत लावलेल्या बॅनरवर शिवछत्रपतींचा आशिर्वाद असा उल्लेख केला आहे. तसेच या बॅनर फक्त मोदींचे छायाचित्र असून त्यावर चलो मोदी के साथ असेही म्हटले आहे. यावरुन राणेंनी भाजपवर निशाणा साधला आहे.
मुंबईतील डायमंड उद्योग गुजरातमधील अहमदाबादमध्ये स्थलांतरीत करण्याचे प्रयत्न सुरु आहे. मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणा-या रिझर्व बँकेतील तीन महत्त्वाचे विभाग दिल्लीत नेले जात आहे. मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा भाजपचा डाव आहे असेही राणेंनी सांगितले. शिवाजी महाराज महाराष्ट्रातील लोकांना त्यांचे आशिर्वाद देतील, गुजरातच्या लोकांना का देतील असे सांगत केंद्रात सत्तेवर आल्यावर भाजपने मुंबई समुद्रकिनारी होणा-या शिवछत्रपतींच्या पुतळ्याला आर्थिक मदत का केली नाही असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
गोळीचे उत्तर गोळीनेच देऊन अशी सिंहगर्जना करणारे नरेंद्र मोदी सत्तेवर आल्यावर किमान ५० वेळा शेजारी राष्ट्राने गोळीबार केला आहे. आता मोदींनी गोळी खिशात ठेवायला घेतली आहे का असे खोचक सवालही राणेंनी उपस्थित केला. मुंबईतील जेएनपीटी बंदरातील व्यवहार गुजरातमध्ये नेऊन जेएनपीटीच्या ताब्यातील १८०० एकर जमिन एका उद्योजकाच्या खिशात घालण्याचा भाजपचा डाव आहे असा गंभीर आरोपही राणेंनी केला आहे. सध्या फक्त गांधीनगर आणि अहमदाबादचाच विकास केला जात आहे असा आरोपही राणेंनी केला.