भाजपा सरकारने सत्तेसाठी शेतक-यांना फसवलं - राज ठाकरे
By Admin | Updated: June 2, 2017 18:56 IST2017-06-02T18:08:00+5:302017-06-02T18:56:11+5:30
राज्यातील आणि केंद्रातील भाजपा सरकारने सत्तेसाठी शेतक-यांची फसवणूक केली, अशी टीका शेतक-यांच्या संपावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.

भाजपा सरकारने सत्तेसाठी शेतक-यांना फसवलं - राज ठाकरे
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 02 - राज्यातील आणि केंद्रातील भाजपा सरकारने सत्तेसाठी शेतक-यांची फसवणूक केली, अशी टीका शेतक-यांच्या संपावरुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
शेतक-यांनी विविध मागण्यांसाठी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी मुंबईत शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते म्हणाले की, भाजपा सरकार खोटी आश्वासने देऊन सत्तेवर आले. त्यांनी शेतकरी आणि जनतेची फसवणूक केली आहे. तिकडे सीमेवर जवान आणि इकडे शेतकरी मरतायेत, मात्र भाजपावाले खुशाल आहेत, असा आरोप राज ठाकरे यांनी यावेळी केला. यापुढे ते म्हणाले की, शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो. मात्र, जे गिरणी कामगारांच्या बाबतीत झाले, ते शेतक-यांच्या बाबतीत होऊ नये. माझा शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा आहे. शेतकऱ्यांसोबत मी कायमच आहे. शेतक-यांच्या संपात अण्णा हजारे मध्यस्थी करत असतील, तर त्यांनी करावे, पण शेतक-यांचा प्रश्न सोडवावा. सर्वात ते महत्त्वाचं आहे, असेही यावेळी राज ठाकरे म्हणाले.
भाजपाने निवडणुकीआधी घोषणा दिल्या. सत्तेत आल्यानंतर घोषणा दिल्या. आता पैसे आहेत का यांच्याकडे? असा सवाल करत जोरदार टीका केली. तसेच, सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहीत नव्हतं का? योजनांना गोंडस नावे देऊन सरकार जनतेला भुलवतंय असेही राज ठाकरे म्हणाले.
राज ठाकरेंनी यावेळी शिवसेनेवरही हल्लाबोल केला. शिवसेनेमध्ये कुठल्याही प्रश्नाविषयी राग किंवा चिड दिसत नाही. ते सध्या कुठे आहेत, तेच दिसत नाही. त्यांना जे काही खाती दिलेली आहेत. त्यातच ते व्यस्त आहेत, असे ते म्हणाले.
दरम्यान, दुसरीकडे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याची ठेवण्याची भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे. तसेच, 5 जून रोजी मुंबई वगळता संपूर्ण महाराष्ट्र बंद ठेवण्याचा निर्णय शेतक-यांनी घेतला आहे. तसेच, 6 जूनला सर्व सरकारी कार्यालयाला कुलूप ठोकणार आणि 7 तारखेला आमदार-खासदारांच्या कार्यालयाला कुलूप ठोकणार, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.
त्याचबरोबर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी किसान कोअर कमिटीच्या पदाधिकाऱ्यांना शेतकरी संपावर चर्चा करण्यासाठी मुंबईला बोलावले आहे. त्यामुळे आज रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी शेतकरी जाणार असल्याची माहितीही पदाधिकाऱ्यांनी दिली.
राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेतील महत्वाचे मुद्दे...
- शेतकऱ्यांचा राग मी समजू शकतो, मात्र जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतकऱ्यांचं होऊ नये
- सरकारकडून जनता आणि शेतक-यांची फसवूक.
- भाजपा सरकार खोटं बोलून सत्तेवर आलं आहे
- योजनांना गोंडस नावं देऊन सरकार भुलवतंय.
- शेतकऱ्यांच्या भावनेला माझा पाठिंबा, शेतकऱ्यांसोबत कायमच आहे.
- जे गिरणी कामगारांचं झालं ते शेतक-याचं होऊ नये.
- सरकार आता म्हणतं, कर्जमाफीसाठी पैसे नाहीत, विरोधात असताना माहित नव्हतं का?