टीकाखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा?

By Admin | Updated: November 12, 2015 03:30 IST2015-11-12T03:30:16+5:302015-11-12T03:30:16+5:30

बिहारमधील पराभवावरून लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर नितीन गडकरी यांनी या दोघांचा जोरदार बचाव केला

Bit to take action against politicians? | टीकाखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा?

टीकाखोर नेत्यांवर कारवाईचा बडगा?

अडवाणींच्या नेतृत्वातही पराभव झालाच होता की!
नागपूर : बिहारमधील पराभवावरून लालकृष्ण अडवाणींसह चार ज्येष्ठ नेत्यांनी जाहीरपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल केल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या दोघांचा जोरदार बचाव केला. या बुजुर्गांवर थेट पलटवार करताना त्यांनी पक्षातील परंपरा आणि अडवाणींच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकांमधील पराभवाचे स्मरण करून दिले. इतकेच नव्हे, तर मोदी आणि शहा यांच्या विरोधात बेजबाबदार जाहीर वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांवर कारवाई करण्याची जाहीर भूमिका गडकरी यांनी घेतली.
बिहारमध्ये भाजपाचा लाजिरवाणा पराभव झाल्यानंतर पक्षात मतभेदांचे फटाके जोरात वाजू लागले आहेत. ही फटाकेबाजी अजून थांबलेली नाही. मंगळवारीच लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, यशवंत सिन्हा
आणि शांताकुमार यांनी मोदी-शहा यांच्यावर हल्लाबोल केला होता. या पार्श्वभूमीवर गडकरी येथे पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले की, या पराभवाबद्दल केवळ मोदी आणि शहा यांना जबाबदार धरले जाऊ शकत नाही. या पराभवाची सर्व पदाधिकारी आणि नेत्यांची सामूहिक जबाबदारी आहे. केवळ मोदी आणि शहा यांना जबाबदार धरणाऱ्यांची वक्तव्ये बेजबाबदार आहेत. त्यामुळे पक्षाची प्रतिमा डागाळली आहे.
नितीशकुमारांचा चिमटा
दारुण पराभवानंतर भाजपात सुरू झालेल्या सुंदोपसुंदीवर आपण काही बोलणार नाही, असे म्हणत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी खास शैलीत चिमटा काढला. ‘दूर बैठे हुए व्यक्ती की तरह देख सकता हूँ’, असे सांगत ते म्हणाले, प्रचारात एवढा आटापिटा करूनही पराभव झाल्याने असे होणे स्वाभाविक आहे.नाही तरी प्रत्येक क्रियेची प्रतिक्रिया होतच असते! ‘अटल, अडवाणी और मुरली मनोहर, भाजपा के तीन धरोहर’ हे या पक्षाचे पूर्वी घोषवाक्य होते, याचेही त्यांनी खुबीने स्मरण करून दिले.
अडवाणी, जोशी यांनी जारी केलेल्या निवेदनावर बोलताना ते म्हणाले की, आम्ही या मुद्द्यावर अडवाणींशी चर्चा करणार आहोत.
बिहारमध्ये आमचा पक्ष आणखी बळकट करण्याकडे आम्ही लक्ष देणार आहोत.
बिहारमधील पराभवानंतर अमित शहा पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता
त्यांनी फेटाळून लावली.
सेनेचाही टोला
भाजपात लालकृष्ण अडवाणी यांचा लेटरबॉम्बच नाही तर अजून बरीच बॉम्बाबॉम्ब व्हायची आहे, असे भाकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कल्याण येथे व्यक्त केले. -वृत्त/४

Web Title: Bit to take action against politicians?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.