बाईकस्वारांचा हलगर्जीपणा जिवावर
By Admin | Updated: February 2, 2015 08:56 IST2015-02-02T04:57:16+5:302015-02-02T08:56:02+5:30
मुंबईच्या दक्षिण भागात असणारी सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची संख्या पाहता या परिसरात मोठ्या

बाईकस्वारांचा हलगर्जीपणा जिवावर
मुंबई : मुंबईच्या दक्षिण भागात असणारी सरकारी आणि खासगी कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात व्यापाऱ्यांची संख्या पाहता या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे बाईकस्वार आणि चारचाकी वाहनचालकांचा प्रवास सुकर व्हावा आणि वाहतूक कोंडीतून मुक्तता मिळावी यासाठी जे.जे. पूल उभारला. मात्र या पुलावरून जाताना काही बाईकस्वारांनी हलगर्जीपणाचे दर्शन दिले आणि त्याचाच फटका अन्य बाईकस्वारांना बसत गेला. बाईकस्वारांच्या हलगर्जीपणामुळे २००२ ते २०१४पर्यंत ५२ बाईकस्वार आणि त्यांच्या सहकार्यांचे प्राण गेले.
२00२ साली जे.जे. उड्डाणपूल उभारून बाईकस्वार आणि चारचाकी वाहनांसाठी खुला करण्यात आला.
हा सर्वच वाहनांना फायदेशीर ठरणारा असल्याने त्याचा बाईकस्वार,
चारचाकी वाहनचालकांकडून मोठ्या प्रमाणात वापर होऊ
लागला. मात्र या पुलावरून जाताना बाईकस्वारांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्यामुळे त्याचा फटका त्यांना आणि वाहतूक नियमांचे पालन करणाऱ्यांनाही बसला. पुलावर मोठ्या प्रमाणात बाईकस्वारांचे अपघात होतानाच त्यात अनेकांचे प्राण जाऊ लागले.
हे पाहता ३१ मार्च २०१० रोजी जे.जे. पूल बाईकस्वारांसाठी बंद करण्याचे आदेश देण्यात आले
आणि १ एप्रिल २०१०पासून त्याच्या अंमलबजावणीस सुरुवात झाली. मात्र ही बंदी झुगारूनही या पुलावरून बाईकस्वार जाण्याचा प्रयत्न
करीत असल्याचे निदर्शनास येत असल्याने पुलाच्या दोन्ही बाजूंना वाहतूक पोलिसांची नेमणूक करण्यात आली.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, २००२ ते २०१४पर्यंत या पुलावर ५२ बाईकस्वारांचा आणि त्यांच्या सहकार्यांचा जीव गेला असून, ६५ जण गंभीर जखमी झाले आहेत. तर १८४ जण किरकोळ जखमी झाले आहेत.
सुरुवातीला असणाऱ्या अपघातांचे प्रमाण पाहता ही बंदी घालण्यात आली मात्र त्यानंतरही बाईकस्वार बंदीकडे दुर्लक्ष करून रात्री आणि मध्यरात्री पुलावरून जात असल्याने त्यांनाही अपघातांना सामोरे जावे लागले. हे पाहता अपघातांचा आकडा अधिक असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)