‘नोटाबंदी सर्वात मोठा घोटाळा’
By Admin | Updated: December 31, 2016 00:51 IST2016-12-31T00:51:28+5:302016-12-31T00:51:28+5:30
नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले; मात्र परिस्थिती सुधारलेली नाही. बँका आणि एटीएमसमोरील रांगा कायम आहे. व्यापार ठप्प झाला आहे. या निर्णयाने देशातील

‘नोटाबंदी सर्वात मोठा घोटाळा’
नागपूर : नोटाबंदीच्या निर्णयाला ५० दिवस पूर्ण झाले; मात्र परिस्थिती सुधारलेली नाही. बँका आणि एटीएमसमोरील रांगा कायम आहे. व्यापार ठप्प झाला आहे. या निर्णयाने देशातील कोणताही काळा पैसा बाहेर निघालेला नाही. उलट हा देशातील सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप काँग्रेसचे राज्यसभा सदस्य के. एन. पुनिया यांनी केला.
ते शुक्रवारी रविभवन येथे आयोजित एका पत्रपरिषदेत बोलत होते. पुनिया म्हणाले, नोटाबंदीचा निर्णय जाहीर झाला त्याच दिवशी कोलकाता येथील एका बँकेतील भाजपाच्या खात्यात ५०० आणि २००० रुपयांच्या नोटांमध्ये तीन कोटी रुपये जमा झाले आहे. तसेच १ मार्च ते ८ नोव्हेंबर यादरम्यान भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने देशभरातील आपल्या खात्यांमध्ये किती रक्कम जमा केली, याची वारंवार माहिती मागूनसुद्धा ती दिली गेलेली नाही. नोटाबंदीच्या निर्णयापूर्वी भाजपा व संघाने देशभरात कोट्यवधीच्या संपत्तीची खरेदी केली आहे, असा गंभीर आरोपही पुनिया यांनी केला. नोटाबंदीमुळे सध्या देशातील लोकांना होत असलेला त्रास जोपर्यंत दूर होत नाही, तोपर्यंत काँग्रेसचा या निर्णयाविरुद्घ संघर्ष सुरूच राहील, असे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)