पोलिसांमुळे भुशी धरण सुरक्षित, एकाचाही बळी नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2016 16:48 IST2016-08-19T16:48:30+5:302016-08-19T16:48:30+5:30
भुशी धरण कोणाचा तरी बळी घेतल्या शिवाय ओव्हर फ्लो होत नाही, हा या धरणाला लागलेला कलंक लोणावळा पोलीस प्रशासनाच्या कर्तव्य दक्षतेमुळे पुसला गेला आहे

पोलिसांमुळे भुशी धरण सुरक्षित, एकाचाही बळी नाही
>- ऑनलाइन लोकमत
लोणावळा, दि. १९ - पावसाळी पर्यटनाचे लोणावळ्यातील सर्वाधिक आकर्षणाचे ठिकाण असलेले भुशी धरण कोणाचा तरी बळी घेतल्या शिवाय ओव्हर फ्लो होत नाही, हा या धरणाला लागलेला कलंक लोणावळा पोलीस प्रशासनाच्या कर्तव्य दक्षतेमुळे पुसला गेला आहे. या वर्षी १५ आँगस्ट अखेर भुशी धरणावर कसलीही जिवितहानी झालेली नसल्याने आज अखेर भुशी धरण हे 'झिरो फेटालिटी धरण' बनले आहे. हे धरणच काय पण लोणावळ्यातील एकही पर्यटनस्थळांवर कोणाचा जीव जाऊ नये याकरिता सर्वोतोपरी खबरदारी घेणार असल्याचे लोणावळा शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.
लोणावळ्याचे भुशी धरण व धरणाच्या पायर्यांवरुन वाहणारे पाणी हे राज्यभरातील पर्यटकांसह परराज्यातील पर्यटकांचे देखील मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे. मात्र या धरणाला सुरक्षेच्या दृष्टीने कसलीही उपाययोजना नसल्याने अनेक पर्यटक धोकादायकरित्या या धरणाच्या जलाशयात उतरुन स्वतःचा जीव धोक्यात घालत असायचे, यामुळे धरणात सातत्याने पर्यटक बुडून मयत झालेल्या घटना घडत असायच्या. दरवर्षी सरासरी १० ते ११ पर्यटकांचा या धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यु झाले आहेत. बळी घेतल्याशिवाय भुशी धरण ओव्हर फ्लो होत नाही असा कलंक या धरणाला लागला होता.
भुशी धरणाच्या सुरक्षिततेबाबत लोकमतने वारंवार आवाज उठवत धरणाला सुरक्षा जाळ्या लावण्याची मागणी लावून धरली होती. याची दखल घेत मध्य रेल्वे प्रशासनाने धरणाच्या पायर्यांवरील बाजुला काटेतार लावली होती. तरी देखील पर्यटक डोंगराच्या बाजुने धरणात उतरत असल्याने गरजेनुसार डोंगराला देखिल सुरक्षा जाळ्या लावण्यात याव्यात अशी स्थानिकांची मागणी लोकमतने मांडली होती. तदनंतर लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी विनायक ढाकणे व शहरचे निरीक्षक चंद्रकांत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक प्रकाश शितोळे यांनी स्वतः काही दानशुर व्यक्तीच्या मदतीने डोंगराच्या बाजुला सुरक्षा जाळी लावून घेतली होती. तसेच पावसाळा सुरु झाल्यापासून निरीक्षक जाधव यांनी भुशी धरणावर कडक बंदोबस्त तैनात करत धरणात उतरणार्या पर्यटकांवर कडक निबंर्ध घातल्याने गत तिन महिन्यात भुशी धरणात पर्यटक बुडाल्याची अथवा मयत झाल्याची एकही घटना घडली नाही. निरीक्षक जाधव यांनी या सर्व प्रकाराचे श्रेय लोणावळा शहरचे सर्व पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना दिले आहे. संघ भावनेने वरिष्ठांच्या व माझ्या सुचनांप्रमाणे त्यांनी काम केल्यामुळेच आम्ही काही जीव वाचविण्यात यशस्वी झालो असे त्यांनी सांगितले.
पोलीसांची भुमिका काही वेळा नागरिकांना कठोर वाटत असली तरी नागरिकांच्या सुरक्षेकरिता कठोर भुमिका घ्यावी लागते असेही त्यांनी सांगितले.
हुल्लडबाजांवर कारवाई सुरुच ठेवणार
पर्यटनाच्या नावाखाली दारु पिऊन धिंगाणा घालणे, महिलांची छेडछाड, अश्लिल हावभाव व शेरेबाजी, दारु पिऊन वाहन चालविणे, सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणे असे प्रकार करणार्या हुल्लडबाजांवर कारवाई मोहिम सातत्याने सुरुच राहणार असल्याचे निरीक्षक चंद्रकांत जाधव यांनी सांगितले.