जिल्ह्यात सर्वत्र जमके बरसला

By Admin | Updated: September 22, 2016 03:24 IST2016-09-22T03:24:18+5:302016-09-22T03:24:18+5:30

यंदा वरुणराजाने ठाणे जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी केली असून या मोसमात पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे.

Berkeley fame everywhere in the district | जिल्ह्यात सर्वत्र जमके बरसला

जिल्ह्यात सर्वत्र जमके बरसला


ठाणे : यंदा वरुणराजाने ठाणे जिल्ह्यावर चांगलीच कृपादृष्टी केली असून या मोसमात पावसाची रेकॉर्ड ब्रेक नोंद झाली आहे. यंदा पावसाने ठाणे जिल्ह्यातील सरासरीचा पल्लाही ओलांडला आहे.
जिल्ह्यातील ७ पैकी ठाण्यात १२६, कल्याण १०८, मुरबाड १०७ टक्के असा सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल साडेपाच हजार मिलिमीटरहून अधिक पाऊस झाला आहे. दुसरीकडे मुंबई-ठाण्याला पाणीपुरवठा करणारी ठाणे- पालघरातील सर्वच धरणे ओव्हरफलो झाली आहेत. मागील तीन महिन्यांत झालेल्या पावसामुळे पालघरातील धामणी, कवडास, वांद्री या धरणांसह ठाण्यातील मोडकसागर आणि बारवी धरण १०० टक्के भरले होते. मात्र, ठाणे जिल्ह्यातील भातसा आणि तानसा धरणे भरायची शिल्लक होती. तीही सध्या चालू असलेल्या परतीच्या पावसात सरासरी भरून झाली आहेत. दरम्यान, परतीच्या पावसाची बुधवारीही दिवसभर रिपरिप सुरू होती. शहरातील काही ठिकाणी सखल भागात पाणी साचले. त्यामुळे वाहतूककोंडीही झाली होती. वरुणराजाचा सध्याचा मूड पाहता सप्टेंबर संपेपर्यंत आकडेवारीच्या नवीन अध्यायाची नोंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, असे असले तरी येत्या ४८ तासांत जिल्ह्याच्या काही भागांत जोरदार अतिवृष्टीची शक्यता असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळवण्यात आली आहे.
मागील दोन दिवसांपासून ठाण्यासह जिल्ह्याच्या विविध भागांत परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे ठाण्यात मागील २४ तासांत ७२ मिमी पावसाची नोंद झाली असून शहराच्या विविध भागांत रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक भागांत वाहतूककोंडी झाल्याचे चित्र दिसून आले. आगीची एक, शॉर्टसर्किटची एक आणि एका ठिकाणी प्लास्टर पडल्याची घटना घडली आहे. परंतु, येत्या ४८ तासांत अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून त्यानुसार त्या ठिकाणच्या महापालिका, नगरपालिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी कार्यालयाने केले आहे.
गेल्या वर्षीच्या पावसाच्या तुलनेत यंदा ठाणे-मुंबईला पाणीपुरवठा करणारी जवळपास सर्वच धरणे वेळेत दुथडी भरून वाहू लागली. त्यामुळे यंदा तरी ठाणे-मुंबईला पाणीटंचाईचा सामना करावा लागणार नाही.
>तालुक्यात आतापर्यंतचा सरासरी पाऊस
ठाणे -३ हजार १२१ मिमी (१२६.४६), कल्याण २ हजार ६७४ मिमी (१०८.९६), मुरबाड - २ हजार ५११ मिमी (१०७.८५), उल्हासनगर - २ हजार ३६८ मिमी (९२.६३), अंबरनाथ - २ हजार २८६ मिमी (९६.७१), भिवंडी - २ हजार ४१६ मिमी (९९.७७), शहापूर - २ हजार १२५ मिमी (८३.१५), एकूण पाऊस - १७ हजार ५०३ मिमी (१०२.०६) (सर्व आकडे टक्क्यांत)

Web Title: Berkeley fame everywhere in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.