‘लोकमत’च्या निर्भीडतेमुळे पदाधिकारी जमिनीवर
By Admin | Updated: March 2, 2016 01:11 IST2016-03-02T01:11:28+5:302016-03-02T01:11:28+5:30
बारामती शहरात जनसामान्यांमध्ये लोकमतने अल्पावधीत सन्मानाचे स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या पंचक्रोशीत अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून लोकमतची ओळख आहे

‘लोकमत’च्या निर्भीडतेमुळे पदाधिकारी जमिनीवर
बारामती : बारामती शहरात जनसामान्यांमध्ये लोकमतने अल्पावधीत सन्मानाचे स्थान पटकाविले आहे. विशेष म्हणजे बारामतीच्या पंचक्रोशीत अग्रगण्य वृत्तपत्र म्हणून लोकमतची ओळख आहे. कोणत्याही पदावरील राजकारण्यांची, पुढाऱ्यांची तमा न बाळगता नागरीकांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी ‘लोकमत’ चा पुढाकार कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार नगराध्यक्ष योगेश जगताप यांनी येथे काढले. लोकमतच्या बारामती कार्यालयाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘नागरिकांच्या समस्या मार्गी लागेपर्यंत निर्भिडपणे केले जाणारे वृत्तांकन आमच्या सारख्या पदाधिकाऱ्यांच्या मनात धडकी भरवते. बारामती विभागात निर्भिड बातम्यांमुळेच ‘लोकमत’ने आपले वेगळे स्थान वाचकांमध्ये निर्माण केले आहे. शहरातील बातम्या निर्भिडपणे लोकमत मध्ये प्रसिध्द होतात. त्यामुळे आमच्यासारख्या पदाधिकाऱ्यांचे पाय जमिनीवर असतात. निर्भिडते बरोबरच विकास कामांना देखील तितकेच महत्त्व ‘लोकमत’मध्ये दिले जाते. बारामती शहर अधिक विकसनशील, सुंदर शहर करण्याचा नगरपालीका प्रशासन, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न आहे. यासाठी मार्गदर्शकाची
भुमिका लोकमतने बजवावी,
असे आवाहन जगताप यांनी केले.
(वार्ताहर)
‘लोकमत’ ने विविध सामाजिक क्षेत्रात राबविलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत. या उपक्रमातून अनेकांना मदतीचा नेहमीच हात मिळाला. सध्या दुष्काळाची तीव्र परिस्थिती आहे. दुष्काळाने होरपळलेले जीवन प्रशासनापर्यंत पोहोचविण्याचे प्रभावी काम ‘लोकमत’ने केले. बारामती विभागातील दुष्काळाची दाहकता ‘लोकमत’ने सातत्याने पुढे आणली. त्यामुळे शासकीय यंत्रणा तत्परतेने त्या गावांमध्ये पोहोचली. दुष्काळातून सावरण्यासाठी प्रभावी उपाय योजना शक्य झाल्या. त्याचबरोबर ‘लोकमत’ने महसूल, कृषी विभागाने राबविलेल्या जलयुक्त शिवार योजनांच्या वृत्ताने देखील सकारात्मक केले. त्यामुळे या कामावर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना तसेच, ग्रामस्थांना प्रात्साहन मिळाले. आगामी काळात देखील लोकमत ने सामाजिकतेचा हा वसा जपावा, ही अपेक्षा व्यक्त करतो, असे मत प्रांताधिकारी संतोष जाधव यांनी व्यक्त केले.
- संतोष जाधव, प्रांताधिकारी
>लोकमत ‘फोकस’मध्ये राहणारे वृत्तपत्र : घनश्याम दरवडे
सर्वसामान्यांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकमत नेहमीच पुढे असतो. त्यामुळेच ‘फोकस’मध्ये राहणारे हे वृत्तपत्र आहे. आगामी काळात देखील ‘लोकमत’ने दुष्काळाचे प्रश्न मांडावेत. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यामध्ये असणाऱ्या दुष्काळाच्या बातम्या ‘लोकमत’मध्ये वाचायला मिळतात. लोकमत मुळेच खऱ्या अर्थाने या प्रश्नांना वाचा फुटते. यापुढे देखील दुष्काळ, शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ‘लोकमत’ने वाचा फोडावी. शासनापर्यंत हे प्रश्न पोहोचवावेत. ही आपली अपेक्षा आहे, असे मत श्रीगोंदा (जि. अहमदनगर) येथील छोटा नेता घन:श्याम दरवडे यांनी व्यक्त केले. मागील काही महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर निर्भिडपणे आवाज उठविणाऱ्या घन:श्याम दरवडे याने ‘लोकमत’च्या बारामती कार्यालय वर्धापन दिनी भेट दिली. आपण राजकारणी होणार नाही. आपल्याला कलेक्टर व्हायचे आहे. कलेक्टरच्या हातात ‘पॉवर’ असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न सुटतील. सरकार बदलले नाही तर फक्त माणसं बदलली. आता पुन्हा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना भेटून दुष्काळ व शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर गावोगावी जाणार आहे. प्रसंगी रस्त्यावर उतरू, असा इशारा या छोट्या घन:श्याम दरवडे याने सांगितले. त्याची आत्मविश्वासी बोली भाषा चक्रावून सोडणारी आहे. प्रत्येक प्रश्नाला हजरजबाबी उत्तर देणाऱ्या घन:श्यामला राजकारण नको, प्रशासनाच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘कलेक्टरच’ व्हायचे आहे.