पीक विम्याच्या रकमेला बँकांची कात्री
By Admin | Updated: August 10, 2015 22:57 IST2015-08-10T22:57:41+5:302015-08-10T22:57:41+5:30
नवीन कर्जाची रक्कम विम्यातून कपात; शेतकरी थेट लाभापासून वंचित.
_ns.jpg)
पीक विम्याच्या रकमेला बँकांची कात्री
संतोष येलकर/अकोला: दुष्काळी परिस्थितीत शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात आले; मात्र पुनर्गठन करून, यावर्षी नवीन पीक कर्ज देण्यात आलेल्या शेतकर्यांच्या कर्जात पीक विम्याची रक्कम बँकांकडून जमा केली जात आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पुनर्गठन करण्यात आले असले तरी, कर्जाची रक्कम जमा करण्यासाठी, पीक विम्याच्या रकमेला बँकांनी कात्री लावली आहे. विमा रकमेतून कर्जाची कपात करण्यात येत असल्याने, आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकर्यांवर पीक विम्याच्या थेट लाभापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. गतवर्षी अत्यल्प पाऊस झाल्याने पिके हातून गेली. नापिकीमुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील विविध भागात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर गतवर्षी पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या पीक कर्जाचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करून, कर्जदार शेतकर्यांना यावर्षीच्या खरीप हंगामात नवीन कर्ज उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य शासनामार्फत घेण्यात आला. त्यानुसार राज्यातील पीक कर्ज घेतलेल्या शेतकर्यांच्या कर्जांचे पुनर्गठन करून, त्यांना नवीन कर्ज उपलब्ध करण्याचे काम बँकांमार्फत करण्यात आले. दरम्यान, राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत पिकांचा विमा उतरविलेल्या शेतकर्यांठी पीक विम्याची रक्कम शासनामार्फत मंजूर करण्यात आली. ही पीक विम्याची रक्कम गत जुलैअखेरपर्यंत राष्ट्रीय कृषी विमा कंपनीमार्फत राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात वितरित करण्यात आली. त्यामध्ये अमरावती विभागातील अकोला, अमरावती, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ इत्यादी पाचही जिल्हय़ातील शेतकर्यांसाठी पीक विम्यापोटी ४२१ कोटी ९ लाखांची रक्कम प्राप्त झाली. प्राप्त झालेली पीक विम्याची रक्कम संबंधित शेतकर्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी बँकांना वितरित करण्यात आली; परंतु पीक कर्जाचे पुनर्गठन करून, नवीन पीक देण्यात आलेल्या शेतकर्यांची पीक विम्याची रक्कम बँकांकडून कर्जाच्या रकमेत जमा केली जात आहे. पीक विम्याची रक्कम यावर्षीच्या पीक कर्जापोटी बँकांकडून कपात केली जात असल्याने, नापिकीच्या परिस्थितीत पीक विमा रकमेच्या थेट लाभापासून वंचित राहण्याची वेळ शेतकर्यांवर आली आहे. जिल्हा अग्रणी बँक चे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांनी पीक कर्जाचे पुनर्गठन करून, ज्या शेतकर्यांना यावर्षी नवीन कर्ज देण्यात आले,अशा शेतकर्यांच्या पीक विम्याची रक्कम पुनर्गठित कर्जाच्या रकमेत जमा करण्याच्या रिझर्व बँकेच्या सूचना असल्याचे सांगीतले. त्यानुसार पीक कर्जाचे पुनर्गठन करून, नवीन कर्ज देण्यात आलेल्या शेतकर्यांच्या पीक विम्याची रक्कम पुनर्गठित कर्जामध्ये जमा केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.