बालगोविंदांना बंदीच

By Admin | Updated: August 12, 2014 02:55 IST2014-08-12T02:55:55+5:302014-08-12T02:55:55+5:30

दहीहंडीचा सराव करताना खाली पडून गेल्या दोन दिवसांत नवी मुंबई व मुंबईत दोन बालगोविंदांच्या झालेल्या मृत्यूची गंभीर दखल

BALGOVINTS BANKED | बालगोविंदांना बंदीच

बालगोविंदांना बंदीच

मुंबई : दहीहंडीचा सराव करताना खाली पडून गेल्या दोन दिवसांत नवी मुंबई व मुंबईत दोन बालगोविंदांच्या झालेल्या मृत्यूची गंभीर दखल घेत उच्च न्यायालयाने सोमवारी १८ वर्षांखालील मुला-मुलींना गोविंदा पथकांत सहभागी करून घेण्यास व दहीहंडी फोडण्यासाठी २० फुटांहून जास्त उंचीचे मानवी थर लावण्यास बंदी करण्याचे निर्देश राज्य सरकारने सर्व दहीहंडी उत्सव मंडळांना द्यावेत, असे आदेश दिले.
दहीहंडी उत्सव सुरक्षितपणे साजरा व्हावा यासाठी आयोजकांनी गोविंदा पथकांना सेफ्टी बेल्ट व हेल्मेट द्यावीत तसेच हंडी फोडण्यासाठी जेथे थर लावले जाणार असतील तेथे जाड गाद्या ठेवाव्यात, असेही आदेश देऊन उंच थरावरून एखादा गोविंदा खाली पडला तरी त्याला दुखापत होणार नाही याचीही व्यवस्था केली.
गेली अनेक वर्षे हंडीची उंची आणि या उत्सवाचे व्यापारी स्वरूप या दोन्ही दृष्टीने सुरू असलेली चढाओढ पाहता कोणत्याही बंधनांविषयी गोविंदा आयोजकांकडून विरोधाचा सूर येऊ लागला होता. त्यादृष्टीने सोमवारी दिलेल्या या आदेशाची उत्सवाच्या वेळी अंमलबजावणी होते की नाही, यावर देखरेख करण्यासाठी न्यायालयानेप्रत्येक विभागासाठी निगराणी समिती नेमण्याचेही निर्देश दिले.
या समितीत स्थानिक लोकप्रतिनिधीसह वॉर्ड आॅफिसर व विभागाचा पोलीस प्रमुख असणार आहे़ दहीहंडीत पाच थरांचे निर्बंध व अल्पवयीन मुलींना यात सहभागी करू नये, अशी मागणी करणारी फौजदारी जनहित याचिका सामाजिक कार्यकर्त्या स्वाती पाटील यांनी दाखल केली होती़ त्याचे प्रत्युत्तर देताना सरकारी वकील संदीप शिंदे व मनकुंवर देशमुख यांनी सुरक्षेसाठी जारी केलेली मार्गदर्शक तत्त्वे सादर केली़ (प्रतिनिधी)

Web Title: BALGOVINTS BANKED