रत्नागिरी : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना उद्धव ठाकरेंनीच सर्वाधिक छळले. त्यांनी जर आपल्याविरोधात टीका करणे थांबविले नाही, तर ‘मातोश्री’च्या आतील सगळ्या गोष्टी बाहेर आणेन, असा इशारा उद्योगमंत्री नारायण राणे यांनी दिला. कोकण दौऱ्यावर आलेल्या राणे यांनी शुक्रवारी रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, माझी मनधरणी करण्यास गुरुवारी रात्री प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे व कृपाशंकर सिंह आले होते. मात्र राजीनाम्याच्या निर्णयावर ठाम आहे. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांचे सचिव वाल्मीकी यांचाही फोन आला. त्यांनाही तेच सांगितले. काँग्रेस नेत्यांनी दिलेला शब्द कधीच पाळला नाही. अपमानित केले. मात्र आता आपली ताकद दाखवूनच देऊ, असा इशारा त्यांनी दिला. ‘बाळासाहेबांना त्रास देणाऱ्यांना सेनेत प्रवेश नाही,’ असे उद्धव म्हणाले होते. यावर राणे म्हणाले, बाळासाहेबांचा सर्वाधिक छळ उद्धवनेच केला. हे तुम्ही ‘मातोश्री’वरील नोकर, शिवसेनेचे जुने नेते व ‘मातोश्री’च्या भिंतींनाही विचारा. दोनवेळा हा माणूस घर सोडून गेला व मुलाबाळांसह हॉटेल हॉलिडे इनमध्ये राहिला होता. ते छळणेच होते.
बाळासाहेबांना उद्धवनेच छळले; राणेंचा हल्लाबोल
By admin | Updated: July 19, 2014 02:54 IST