बदलापूरच्या टीडीआर घोटाळ्याचा परिणाम अंबरनाथच्या विकासावर
By Admin | Updated: August 22, 2015 00:47 IST2015-08-22T00:47:49+5:302015-08-22T00:47:49+5:30
बदलापूरच्या वहुचर्चेत टीडीआर घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात अंबरनाथचे दोन प्रमुख अधिकारी अडकले आहे

बदलापूरच्या टीडीआर घोटाळ्याचा परिणाम अंबरनाथच्या विकासावर
बदलापूर : बदलापूरच्या वहुचर्चेत टीडीआर घोटाळा प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने गुन्हा दाखल केल्याने या प्रकरणात अंबरनाथचे दोन प्रमुख अधिकारी अडकले आहे. त्यात मुख्याधिकारी आणि सहाय्यक नगररचनाकार गुंतल्याने हे दोन्ही अधिकारी पालिका कार्यालयातुन गायब झाले आहे. त्यामुळे अंबरनाथ शहरातील विकास कामांवर परिणाम होणार आहे.
कुळगांव-बदलापूर नगरपरिषदेत २०१० ते २०१३ या तीन वर्षांच्या कार्यकाळात मोठी अफरातफर करण्यात आली. टीडीआर (सार्वजनिक सुविधा विकास हस्तांतर)अंतर्गत अनेक बोगस कंपन्यांना कामे देऊन हा घोटाळा करण्यात आला. विकास नियमावलीला बगल देऊन हे काम करण्यात आले होते. ज्या कार्यकाळात हा घोटाळा झाला त्या काळात बदलापूरच्या मुख्याधिकारीपदी भालचंद्र गोसावी आणि सहाय्यक नगररचनाकार पदावर सुनिल दुसाने हे कार्यरत होते. या घोटाळ्यानंतर गोसावी यांची बदली अंबरनाथ नगरपरिषदेत करण्यात आली. तर योगायोगाने सहाय्यक नगररचनाकर दुसाने यांनाही अंबरनाथचा पदभार देण्यात आला. १९ आॅगस्ट रोजी यांच्यावर गुन्हा दाखल झाला त्यावेळी हे दोन्ही अधिकारी अंबरनाथमध्ये कार्यरत होते. शहराच्या विकासाचे धोरण ठरविण्याची मोठी जबाबदारी ही मुख्याधिकारी आणि सहाय्यक नगररचनाकार यांच्याकडेच असते. मात्र अंबरनाथमध्ये कार्यरत असलेले हे दोन्ही अधिकारी बदलापूरच्या टीडीआर घोटाळ्यात अडकल्याने हे दोन्ही अधिकारी गेल्या काही दिवसांपासुन अंबरनाथ पालिकेत येत नाहीत. त्यामुळे शहरातील विकास कामांवर निर्णय घेण्यास विलंब होत आहे.
अंबरनाथप्रमाणे बदलापूर शहराचीही तीच अवस्था झाली आहे. प्रमुख अधिकारी या घोटाळ्यात अटकल्याने हे सर्वजन पालिका कार्यालयातुन गायब झाले आहेत. त्यामुळे बदलापूर शहरातील विकास कामेही खुंटली आहेत. तर उरलेल्या अधिका-यांना संबंधीत प्रकरणातील कागदपत्रे तयार करण्याची कामे देण्यात आली आहेत. (प्रतिनिधी)