संघभूमीत लागले आझादीचे नारे
By Admin | Updated: August 14, 2016 23:01 IST2016-08-14T23:01:43+5:302016-08-14T23:01:43+5:30
अखंड भारत दिवसाचे निमित्त साधून संघस्थानावर संघ स्वयंसेवकांनी आझादीचा सूर पकडत दहशतवाद व फुटीरवाद्यांविरोधात नारे लावले

संघभूमीत लागले आझादीचे नारे
ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 14 - पाकव्याप्त काश्मीर, कन्हैय्या कुमार प्रकरणात देशाविरोधात आझादीचे नारे लागल्यामुळे वाद निर्माण झाला होता. अखंड भारत दिवसाचे निमित्त साधून संघस्थानावर संघ स्वयंसेवकांनी आझादीचा सूर पकडत दहशतवाद व फुटीरवाद्यांविरोधात नारे लावले. संघ स्मृतिमंदिर परिसरात देश मांगे आतंकवाद से आझादी, देश मांगे अलगाववाद से आझादी असे नारे स्वयंसेवकांनी लावले.
यावेळी संघाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य इंद्रेश कुमार यांनी काश्मिर मुद्द्यावरुन पाकिस्तान तसेच फुटीरवाद्यांवर टीका केली. गेल्या काही काळापासून भारतातच राहून आपल्याच देशाविरुद्ध गरळ ओकणारे दिसून येत आहेत. ज्यांना भारत जिंदाबाद वाटत नाही त्यांनी देश सोडावा, असे परखड मत त्यांनी व्यक्त केले. पाकिस्तानने जर भारताला आव्हान दिले तर त्यांचे अस्तित्वच संकटात येऊ शकते. . देशातील प्रत्येक इंच जमीन महत्त्वाची आहे व पाकव्याप्त काश्मीर एक दिवस नक्कीच देशात परत येईलच. परंतु भारतापासून वेगळे करण्यात आलेले इतर देशदेखील भारताचे नेतृत्व मान्य करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी इंद्रेशकुमार यांनी मोदी सरकारच्या कार्यप्रणालीचे कौतुक केले.
स्वातंत्र्यलढ्यात संघ स्वयंसेवकांचा मौलिक सहभाग
संघाने स्वातंत्र्यलढ्यात काहीही योगदान दिले नाही अशी टीका होते. परंतु १९४७ अगोदर कॉंग्रेस हा पक्ष नव्हता तर ती स्वातंत्र्यचळवळ होती. मीठ, जंगल सत्याग्रहात स्वयंसेवक सहभागी होती. शिवाय क्रातिकाऱ्यांना स्वयंसेवक मदत करायचे. फाळणीनंतर निर्वासितांसाठी स्वयंसेवकच धावले होते. तिरंग्याचा संघाने नेहमीच सन्मान केला आहे. परंतु जे संघावर आरोप करतात त्यांनी स्वत:च्या कपड्यांवरील डाग पहावे, असे इंद्रेश कुमार म्हणाले