विमानवारीसाठी साहित्यिक ‘प्रचंड आशावादी’
By Admin | Updated: November 14, 2014 00:51 IST2014-11-14T00:51:22+5:302014-11-14T00:51:22+5:30
गेले काही वर्ष विश्व साहित्य संमेलन झालेच नाही. त्यामुळे विदेशात विमानाने जाण्याची साहित्यिकांची संधी हुकली. यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या घुमान येथे होणार आहे. साहित्यिकांचा वेळ वाचावा

विमानवारीसाठी साहित्यिक ‘प्रचंड आशावादी’
कमी खर्चात घुमानला जाणार विमान : कंपनीशी बोलणी सुरू
राजेश पाणूरकर - नागपूर
गेले काही वर्ष विश्व साहित्य संमेलन झालेच नाही. त्यामुळे विदेशात विमानाने जाण्याची साहित्यिकांची संधी हुकली. यंदाचे साहित्य संमेलन पंजाबच्या घुमान येथे होणार आहे. साहित्यिकांचा वेळ वाचावा आणि कमी खर्चात साहित्यिकांना जास्तीतजास्त संख्येने घुमानच्या साहित्य संमेलनात सहभागी होता यावे म्हणून भोपाळ, नागपूर, पुणे येथून विशेष विमाने सोडण्यात येणार आहेत. त्यापैकी पुण्यातून एक विशेष विमान घुमानसाठी निश्चित करण्यात आले आहे. नागपूर आणि भोपाळ येथूनही घुमानसाठी थेट विशेष विमान सोडण्यात यावे म्हणून प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे घुमानच्या साहित्य संमेलनाला उपस्थित राहू इच्छिणाऱ्या साहित्यिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून भोपाळ आणि नागपूर येथूनही विशेष विमानाची सोय करण्यात येईल, याबाबत साहित्यिक ‘प्रचंड आशावादी’ आहे.
साहित्य संमेलनाच्या आयोजन समितीने नुकतीच ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. रसिक आणि कलांवर प्रेम करणाऱ्या शरद पवार यांनी संमेलनाला सर्वतोपरी सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्यांनी पुण्यातून एक विमान घुमानसाठी विशेषत्त्वाने निश्चित केले आहे. यामुळे पुणे आणि परिसरातील साहित्यिक, रसिक तसेच साहित्य महामंडळाचे पदाधिकारी थेट विमानाने घुमानला पोहोचणार आहेत. या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या आयोजन समितीत महत्त्वाची भूमिका असणाऱ्या गिरीश गांधी यांनीही नागपुरातून विशेष विमान घुमानसाठी सोडण्याची तयारी चालविली आहे.
विदर्भ साहित्य संघाचे पदाधिकारी, विदर्भातील रसिक यांना घुमानला विमानाने कमी वेळात आणि कमी खर्चात पोहोचता यावे. हा उद्देश यामागे आहे.
त्यासाठी विमान कंपन्यांशी गिरीश गांधी यांची बोलणी सुरू असून यासंदर्भात योजना करण्यासाठी गिरीशभाऊ थेट दिल्लीत पोहोचले आहेत. संमेलनाचे आयोजक भारत देसडला, संजय नहार यांची दिल्लीत भेट घेऊन गिरीश गांधी यांनी नागपुरातून संमेलनासाठी विशेष विमान सोडण्यात यावे, यासाठी प्रभावी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यांच्या या प्रयत्नाला यश यावे म्हणून सारेच साहित्यिक आणि संमेलनाला जाऊ इच्छिणारे रसिक प्रार्थना करीत आहेत.
भोपाळ येथूनही मराठी रसिक या संमेलनाला जाण्यासाठी इच्छूक असून रसिकांची संख्या पाहता भोपाळमधूनही विशेष विमानाची सोय करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे कळले.
एकूणच घुमानच्या साहित्य संमेलनाला जाण्यासाठी यंदा चांगलाच उत्साह असून संत नामदेवांच्या नगरीत साहित्यिक रसिकांचे स्वागत करण्यासाठी आयोजकही उत्सुक आहेत.